Friday, July 27, 2012

दाल रोटी खावो ..प्रभु के गुण गावो


दाल रोटी खावो ..प्रभु के गुण गावो..

   सकाळी सकाळी टीव्ही चॅनेलच्या वार्ताहरानं खासदार श्रीमती रेखा यांचा बंगला गाठला.बंगल्याच्या आवारात प्रवेश करताच वार्ताहराच्या कर्णपटलावर दाल रोटी खाओ ,प्रभु के गुण गावो,हे भजन पडलं.त्याचेही हात नकळत जोडले गेले.प्रभुचं नामस्मरण करत करतच त्याने बंगल्यातील दिवाणखान्यात प्रवेश केला.

   रेखाजीच ते भजन गात होत्या.वार्ताहराला बघताच त्यांनी भजन गाण्याचं थांबवलं.त्यांनी त्याला बसायला सांगितलं.येण्याचं प्रयोजन विचारलं.

   आपलं अभिनंदन करायला आलोय रेखाजी.

   वा वा..सिंगापूरला झालेल्या आयफा अवॉर्ड कार्यक्रमात मी मस्त झक्कास दिसत होते नि ती श्रीदेवी भकास दिसत होती यासाठीच ना माझे अभिनंदन..थँक्यू व्हेरी मच..रेखाजी अत्यानंदानं म्हणाल्या.

   त्यासाठी नाही हो रेखाजी तुमचं अभिनंदन..

   मग कशासाठी,रेखाजी खटटू होत म्हणाल्या..उन्होने कुछ हमारे बारे ब्लॉगमे लिखा तो नही..

   नाही हो रेखाजी..

   मग फुकटाचं कशाला अभिनंदन करतो रे तू..नाराज होत रेखाजी म्हणाल्या..

   अहो,आता तुम्ही पीडीएस म्हणजे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टिम कमिटवर नियुक्त झालात ना...त्यासाठी अभिनंदन..

   थँक्स हं,अरे आतापर्यंत एकहीजण मला याबद्दल बोलला नाही,कुणी एसएमएस पाठविला नाही..तूच पहिला अभिनंदन करणारा..मस्त वाटतय ..अरे माझी ती ड्रिम होती.डिस्ट्रिब्युशन करायचं..

   आँ,काय सांगता काय,रिपोर्टरनं अतिव आश्चर्यानं विचारलं..

   खरच रे,माझी फार वर्षाची इच्छा होती की आपणही डिस्ट्रीब्युटर व्हावं.या देशात महिला हिरॉईन होऊ शकते,आयटेम डान्सर होऊ शकते,पायलट होऊ शकते,इंजिनियर होऊ शकते,सीए होऊ शकते,सेक्रेटरी होऊ शकते,पोलीस होऊ शकते,मंत्री ,जिल्हा परिषद अध्यक्ष,सरपंच होऊ शकते,राज्यपाल होऊ शकते,चीअर लिडर होऊ शकते तर मग डिस्ट्रिब्युटर कां होऊ शकत नाही..आमच्या फिल्म इन्डस्ट्रिमध्ये एकही महिला डिस्ट्रिब्युटर नाही हो..100 वर्षात एकही झाली नाही.डोंच यू थिंक,बहुत ना इन्साफी है ये..म्हणूनच मला डिस्ट्रिब्युशन करायचं होतं.मोस्ट पॉवरफूल असतो तो.तुमच्या दांगड पेपर डिस्ट्रिब्युटर सारखा.डिस्ट्रिब्युटर किसिकोभी बना सकता हे और बिगाड भी सकता है.मी डिस्ट्रिब्युटर तेव्हाच झाले असते ना तर उनके सभी पिक्चरोका डिस्ट्रिब्युशन मीच केलं केलं असतं.सर्व पिक्चर हिट्ट करुन दाखवलं असते.पण त्यांच्या आणि माझ्याही नशिबात नव्हतं ना..म्हणून राहून गेलं.तिरुपतीच्या इच्छेपुढे आपण काय करणार..नाही का..

   पण,रेखाजी तेव्हा तुम्ही कां नाही डिस्ट्रिब्युटर होण्याचा प्रयत्न केलात..

   अरे,तेव्हा माझ्या सगळा वेळ स्टुडिओत नाचण्यात आणि स्टुडिओच्या बाहेर उनको न्याहाळण्यात गेला ना..पण बघ प्रभुच्या बंगल्यात देर आहे पण अंधेर नाही..मला अखेर न्याय मिळालायच..मी डिस्ट्रिब्युटर झालेच ना...तेव्हा जे जमलं नाही ते आता करुन दाखवीन.उनकी आनेवाले पिक्चरोका डिस्ट्रिब्युशन मैं लुंगी..

   पण,रेखाजी तुमच्या डोक्यात जे डिस्ट्रिब्युटशन आहे ना,ते हे नव्हे हो..

   मग,

   अहो,देशातल्या गरिबांना दाल रोटीचं डिस्ट्रिब्युशन कसं पारदर्शकपणं करायचं हे ठरवण्यासाठी ही समिती काम करते.आज तुमच्या बंगल्यात मी जेव्हा प्रवेश केला तेव्हा तुम्ही दाल रोटी खाओ प्रभु के गुण गावो,हे भजन गात होतात ते बघून मला अत्यानंद झाला. आपण दाल रोटी खाता नि ते सुध्दा प्रभुचे नाव घेत घेत यासाठी खास अभिनंदन हं..फक्त त्यात सद्गुरुनाथ महाराज की जय म्हंटल की हे भजन सुफळ पूर्ण होईल..

   अरे, थांब मी काही बाबा दाल रोटी खात नाही हं..

   मग..मस्का पाव खाता की काय..

   नाही रे बाबा

   मग वडा पाव खाता..

   नाही रे

   मग झुणका भाकर..  

   नाही रे

   मग बेसन भात

   वो क्या होता है..

   आपल्या देशातील बहुसंख्य गरीब माणन्स हेच खातात नि प्रभुचं नाव घेतात.तुम्हाला ते कसं काही माहीत नाही.तुम्ही चित्रपटांमध्ये इतक्या गरिब मुलिच्या भूमिका केल्या.तेव्हा काय उपाशी राहत होतात की काय..

   तसं नाही रे..मी काय खात होते किंवा खाते हे माझं सिक्रेट आहे.

   सिक्रेट ..वार्ताहरानं आश्चर्यानं विचारलं.

   मग..अरे मी काय खाते हे जर कळलं तर मी फॉरएव्हर यंग कां दिसते आणि आजच्या हिरॉइन्सना कॉम्प्लेक्स देते हे कळेल ना साऱ्यांनाच म्हणून ते गुपित अजून मी कुणाला सांगितलं नाही.

   .के.भारतातले गरीब माणसं काय खातात,किती खातात याची तुम्हाला कल्पना आहे ना..

   नाही बुवा..पण त्याची काय गरज आहे.

   त्याशिवाय दाल रोटी के भाव कळणार नाही आणि तुम्ही समितीवर काम कसं करु शकणार इफिशिएंटली..

   त्यात काय मोठसं,अपने मनोजकुमार आहेत ना..त्यांना रोटी कपडा मकानचा दांडगा अनुभव आहे..त्यांची ट्यूशन लावून घेते की..

    धन्य धन्य..रिपोर्टर मनात म्हणाला..


कॉपी-बहादूर


कॉपी-बहादूर

   यंदा विविध परीक्षांच्या समयी कॉपीबहादुरांवर विशेष लक्ष ठेवण्यात आलं होतं.तरी सुध्दा काहीशे किंवा काही हजार कॉपी बहादुरांनी पराक्रम गाजवल्याचं दिसून आलचं.या त्यांच्या पराक्रमाला सलाम ठोकायला हवा.पण तसं होत नाहीयना.कॉपी करणं म्हणजे कुकर्म,असं समजलं जातं.ते सुध्दा लहान सहान नाही तर फार मोठ्ठ.म्हणून कॉपी बहादुरांची बातमी मोठी होते.बिचारे बहादूर.

   अहो,कॉपी करणं म्हणजे,बाजरात गेलं नि घेतला भाजीपाला,किंवा मग घेतला कागद नि केलं ला नि ला की झाली कविता.इतकं सोप्प थोडचं आहे,कॉपी करणं. पामेला बोर्डेसनं हेलन किलरची कॉपी केली होती म्हणे.किंवा स्व.देवआनंद कुणा एका ग्रेगरी पॅकची कॉपी करायचं असं त्यांच्या  शेवटच्या श्वासापर्यंत सांगितलं गेलं.किंवा मग स्व.एम.एफ हुसन हे त्यांच्या घोड्याचीच कॉपी अखेरपर्यंत करत राहिले असं सांगितलं गेलं.किंवा मग बिपाशा बसू ही अँजेलिना ज्योलीची कॉपी,कपडयांपासून ते तंगड्या दाखवण्यापर्यंत करते असंही बोललं जातं. म्हणजे नेमकं या ग्रेट मंडळीनी काय केलं हे मात्र कुणी स्वयंस्पष्ट केलं नाही.याचा अर्थ कॉपी करणं म्हणजे काय,याची नीट व्याख्याच अद्याप कुणी करु शकलेलं नाही.

   यशस्वी कॉपी करणं हे यशस्वी जीवनाचा मूलमंत्र होय,असं थॉमस पेन या विचारवंतानं कां लिहून ठेवलं नाहीय,हा प्रश्न पडतो. त्यांचं हे असलं वचन आज सुवर्णाक्षरांनी जगात नोंदवलं गेलं असतं..अपवाद वगळता जगातील श्रेष्ठ आणि कनिष्ठ माणसं सुध्दा कॉपी बहादूर होती या धाडसी विधानाला महेश भट एका क्षणात पाठिंबा देतील आणि त्यावर एक तात्विक प्रवचन टाइम्समध्येही लिहू शकतील.एडिसन महान होताच,पण त्याने शोधलेल्या विद्यूतबल्बची कॉपी करुन ज्याने कारखाना काढला तो त्याच्यापेक्षा महान ठरला नि त्याच्यापेक्षा मोठा झाला.अर्जुनानं द्रोणाचार्याची कॉपी केली नि तो धर्नुविद्देत त्यांचा बाप ठरला.अश्वत्थाम्याला मात्र बापाच्या विद्येची धड कॉपी करता आली नाही नि ब्रम्हास्त्र प्रयोगाच्या वेळेला त्याचे पाय लटपटले.पुढे सर्वनाश झाला.महाभारतातला संजय हा सर्वकालिक श्रेष्ठ कॉपी बहादूर.इतकी सक्सेफूल कॉपी अद्याप कुणालाही करता आलेली नाही.मराठी आणि हिंदी साहित्यातल्या रहस्यकथा या कॉपीच्या अंतरंगातील एकाहून एक रम्य,मनमोहक आणि चित्तथरारक इतिहासाच्या साक्षिदार आहेत.बऱ्याच मराठी नाटकांची कॉपी माधव महानोर यांच्या चाणाक्ष नजरेतून सुटल्या नव्हत्या.भप्पी लाहिरी या कॉपी-नररत्नाचं कौतुक करावं तितकं कमीच.कॉपीच्या बळावर भप्पी अनेक वर्षं आघाडीचा संगीतकार होता,या ऐतिहासिक नोंदिवर अनेकांचं एकमत झालेलं आहे.त्यांच्याच वारसा सध्या प्रीतम नावाचे संगीतकार चालवताहेत नि यशच्या झोपाळ्यावर त्यांच्या झुल्फ्यांसह

झुलताहेत.

   हिंदी चित्रपटसृष्टी ही कॉपीची हिरे-माणिक यांची खाणच होय.या सृष्टीतील कॉपीचा प्रवास चित्तथरारक आहे.हॉलीवूडच्या चित्रपटांची हिंदी चित्रपटसृष्टीनं कशी,कशी कॉपी केली यावर हजारेक ग्रंथ पाडता येऊ शकतातच.पण कालौघात हिंदी चित्रपटांनी आपल्याच चित्रपटांची कॉपी करण्याच्या पराक्रम केलाय .

   असं म्हणतात की,दिलीप कुमार यांनी ओमार शरीफ या परदेशी नटश्रेष्ठाची कॉपी केली नि ते अभिनय सम्राट बनले.अमिताभ बच्चन यांनी दिलीप कुमार यांची कॉपी केली नि ते सर्वकालिक सम्राट बनले.कॉपी प्रकरणातलं सुवर्ण प्रकरण उल्हासनगराचं आहेच की.कॉपीचं महत्व नाकारणं हे ताजमहालाचं सौंदर्य आणि अजिंठा वेरुळचं कवित्व नाकारण्या सारखंचं ठरतं.

   कॉपी बहादुरांची शान एखाद्या योध्यासारखीच असते.कॉपी करणं हे येरागबाळ्याचं काम नव्हे.त्याला सिंहाचं काळीज लागतं.वाघाचं ह्रदय लागतं.कॉपी बहादुरांना त्यांचं धाडसी कृत्य जीव मुठित धरुन पार पाडावं लागतं.पानितपावर मराठ्यांनी जीव मुठित धरुन अब्दालीवर आक्रमण केलं,या विधानाचं गांभिर्य ज्यांना कळेल त्यांनाच कॉपी बहादुरांच्या,जीव मुठित घेऊन कॉपी कृत्य करण्याचं महत्व कळेल.अशीच मंडळी कॉपी बहादुरांचं तोंडभरून कौतुक करतील.आणि ही कॉपी बहादूर मंडळी कशी खंदी राष्ट्रीय वीर आहेत याची खात्री पटून ते त्यांना दंडवत घालतील.

   000