Saturday, May 4, 2013

कुबेराचा रिता खजिना


 कुबेराचा रिता खजिना
    देवादीदेव इंद्रसेन महाराजांना नको नको ते बोल कुबेरमहोदय लावत होते.त्यांचं काही चुकीचं नव्हतं म्हणा.ते नावाचेच खजिनदार कुबेर राहिले होते.खजिना रिता-रिताच होत असल्याचं पाहण्याचं त्यांच्या नशिबी आलं होतं.हा रिता खजिना बघायला इंद्रसेनांना वेळ नव्हता.एखादे समयी कुबेर इंद्रसेनांकडे गेलेच तर ते म्हणायचे बघण्याचा काळ अद्याप आलेला नाही.त्यांचा सारा काळ आणि वेळ अप्सरांच्या जुल्फ्यांमध्ये गुंतलेला.स्वर्ग दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आलेला असताना खजिनादार कुबेर यांची झोप जाणार नाही तर काय? त्यामुळेच त्यांचं इंद्रसेनांना बोल लावणं नारदांच्या कानी जाताच ते कुबेरांकडे धावते झाले.
    कुबेरानं नारदापुढं त्यांचं दु: मोकळं केलं.तो धाय मोकलून रडू लागला.हे हुंदके काही थांबेना.हे हुंदके व्यवस्थितरित्या कैलासनिवासी महादेव ,वैकुंठ निवासी नारायण,प्रभादेवीनिवासी सिध्दी विनायक,तिरुमालानिवासी तिरुपती यांच्यापर्यंत पोहचवण्याचं काम नारदांनी केलं.इंद्रसेनांना तोंडघशी पाडण्याची संधी ते शोधतच होते.महागाई आणि प्रवासभत्यात वाढ करण्यासाठी कायम नकार देणाऱ्या इंद्रसेनाला कोंडित पकडण्याची चांगली संधी आयतीच मिळाली होती.
    नादराचं नमक मिसळलेले कुबेराचे हुंदके पोहचताच,महादेव,श्री नारायण,श्री तिरुपती,श्री सिध्दीविनायक तडक इंद्रप्रस्थी हजर झाले.
    इंद्रसेनांमुळे कुबेरावर अश्रू ढाळण्याची वेळ आल्याचं त्यांच्या लक्षात आलं.त्यांनी इंद्रमहाली कूच केले.इंद्रसेनांना धारेवर धरुन विशेष दरबाराचं आयोजन करण्याचं फर्मान सोडलं.
    विशेष दरबार आयोजित झाला.कुबेरानं रिता होत असलेल्या खजिनाचा वृत्तांत अश्रू ढाळत सांगितला.वसुंधरा पुत्र टॉम क्रुझ,वसुंधरा सुकन्या ऐश्वर्या रॉय,वसुंधरा राजपूत्र रणबीर कपूर यांचे खजिने,हे दिन दुने रात चौगुने भरत असताना कुबेराचा खजिना रिता रिता व्हावा हे विपरित घडत असल्याचं कुबेरानं सांगून टाकलं.
    इंद्रसेना,पैसे झाडाला लागत नाही हे लहानपणी पिताश्रींनी सांगितलेलं वचन विसरलास कसा?महादेव म्हणाले.
    तुला फक्त आठवण राहते ती नव्या अप्सरेच्या डोक्यात माळलेल्या फुलांच्या रंगांची.विष्णू बोलले.
    कल्पवृक्ष नावाची फोक वसुंधरेच्या पुत्रांना सांगूनही बरीच शतके लोटली.तू या फोकानाडीच्या रम्य स्वप्नातच दिवसरात्र रममाण राहतोस रे... ब्रम्हदेव बोलले.
    खजिना भरण्यासाठी आता काय करावं,तुम्हीच सांगा,रडकुंडिला आलेले इंद्रसेन म्हणाले.
    सर्व देवांनी एकमेकांकडे बघितले.कुणालाही निश्चित उपाय सूचेना.
     काहीच करता नाही आलं तर मी माझा फंड ट्रान्सफर करीन इकडे,तिरुपती म्हणाले.
    तो तात्पुरता उपाय झाला.शिवाय वसुंधरेची सुपूत्रं त्यात बऱ्याच कायदेशीर अडचणी निर्माण करतील.त्यामुळे एक खडकूही इकडे यावयाचा नाही.श्रीकृष्ण म्हणाले
    मग आता काय करावयाचे?इंद्रसेन येऊन म्हणाले.
    तुम्ही आयआयटीच्या प्रवेशासाठी कोचिंग क्लास काढा. सिध्दीविनायक म्हणाले. प्रभादेवीस्थित त्यांच्या निवासाच्या आजुबाजूला अशा कोचिंग क्लासेसच्या जाहिरातींचा सुकाळ त्यांच्या चाणाक्ष नजरेतून सुटला नव्हता.त्यांच्या निवासस्थानी येणाऱ्या वृत्तपत्रांचा शुभप्रारंभ बातम्यांनी होण्याऐवजी या कोचिंगक्लासच्या जाहिरातींनी होतो,हा बदलही त्यांनी अचुक टिपला होता.आयआयटी कोचिंग क्लासचे सुवर्णपर्व महाराष्ट्रदेशीच नव्हे तर भारतदेशी आल्याचेही मुषकस्वामींनी त्यांच्या निदर्शनास आणलं होतं. हे सारं सिध्दीविनायकांनी दरबारात सविस्तरपणे मांडलं.
    आयआयटी कोचिंग क्लासेस हे कुबेरासाठी कल्पतरुवृक्ष ठरु शकतो याकडे सिध्दीविनायकांनी लक्ष वेधलं. सिध्दीविनायकांच्या चौकस बुध्दीचं सर्वांनी कौतुक केलं.
    नारदा,तू वारंवार पृथ्वीवर भ्रमंतीस जातोस,तुझ्या कसं लक्षात नाही आलं या आयआयटी कोचिंग क्लास कल्पवृक्षाबद्दल. नारदांकडे रागाने बघत नारायण म्हणाले.
    नारद करु लागले.
    इंद्रसेना,नारदाचा आतापर्यंतचा टीएडीए खारीज करुन टाका.कुबेराचा खजिना यांच्या प्रवासभत्यात आणि खाणेपिणेभत्यातच रिता होत चाललाय.आता फुकट फौजदारी बंद.जोपर्यंत 100 विद्यार्थी कोचिंग क्लासमध्ये नारद आणत नाही तोपर्यंत त्यांना पुढचा दौरा देऊ नका,महादेव गरजले.
    दुसऱ्याचं घर जळावं म्हणून लावलेली आग कधीकधी आपल्यावर उलटते,याचा अनुभव नारदांना यानिमित्त आला.


ओम आळसाय नम:


ओम आळसाय नम:
    अरे, गधड्या असा कसा रे तू आळशी? असं सतत कानावर पडत असणाऱ्या मोरुला परवा दिलासा मिळाला.
    तो आळशी असल्याचं त्याच्या बापानं जगजाहीर करुनच टाकलं होतं.या आळश्याचं व्हायचं कसं? हा निपजलाच कसा? तो सुध्दा आपल्याच घरी कसा ? असेही सवाल मोरुचा बाप बरेचदा मोरुच्या मायजवळ करायचा.मात्र मोरुच्या मायला लेकराचं भारी कौतुक.मोरु दिवसभर चर-चर चरतो.झोप-झोप झोपतो.कोणतही काम-धाम करत नाही.टीव्हीच बघत बसतो.त्यामुळे तो कसा गोल-मटोल  म्हणजे हेल्थी झालाय.आणि हेल्थ इज वेल्थ असं गुरुजींनीच सांगितलं नाही का? मग गुरुजीची अक्कल मोठी की तुमची ? असं आणि अशा शेडचा प्रतिवाद मोरुच्या मायने त्याच्या बापाला मोरुच्या आळसाचा सवाल जेव्हा जेव्हा विचारला तेव्हा-तेव्हा केला होता.
    मोरुची आजी सुध्दा तिच्या पोराला म्हणजेच मोरुच्या आज्याला हज्जारदा असच काहीबाही म्हंटल्याचं ती या घरात सून म्हणून आल्यापासून ऐकत होती.तुम्ही सुध्दा कोणतं काम करता.गावात उंडारण्याशिवाय नि पानठेल्यावर जाऊन खर्रा कोंबण्याशिवाय पचपच थुंकण्याशिवाय,असं सुध्दा मोरुची माय तिचा या घरातला एक्सपिरियन्स वाढल्यावर आणि स्थान पक्क झाल्यावर बेधडक म्हणत असे. गंमत म्हणजे मोरुच्या आज्याने त्यास संमती दर्शवली होती.जाऊद्या जाऊद्या तुम्ही कोणते दिवे लावले हे मला सांगू नका,असं आजी,तेव्हा आज्याला म्हणाली होती.
    तर,मोरुच्या घराण्यातल्या पुरुषांचा इतिहास असा हा आळसानं समृध्द आणि संपन्न असलेला. या समृध्द इतिहासाची फळं आपला बाप आणि आपला आजा चाखत होता.आपणही तेच करतो तर आपला बाप मात्र जीव खातो.याची खंत मोरुला लागली असायची.ही खंत कशी दूर होईल या चिंतेत तो रात्रंदिवस असायचा.मिरेला जशी तिच्या प्रभुची धून लागली असायची ना,तसच हे होतं.त्यामुळे खाणं-पिणं आणि चिंतन-मनानासाठी झोपणं.या चक्राला मोरुनं जवळ केलं होतं.बापला जरी तो आळशी वाटत असला तरी खरं वास्तव हे असं होतं.मात्र ते बापाला समजावायचं कसं या प्रश्नाचा तिढा बम्युर्डा त्रिकोनाच्या तिढ्यासारखा होता.पण म्हणतात ना  भगवानके घर देर है लेकीन अंधेर नही.तसेच झाले.
    इंग्लंडचे शास्त्रज्ञ मोरुच्या मदतीला धावले.कोणत्याही देशातील शास्त्रज्ञ हे चांगल्याअर्थी बऱ्याच उपद्व्यापात गुंतलेले असतात.असाच हा उपद्व्यापी शास्त्रज्ञ परवाच त्याचं नवं संशोधन जगाला सांगता झाला.त्याच्या संशोधनाचा सार असा की,तुम्ही आळशी आहात,हा काही तुमचा दोष नाही.हा काही परिस्थितीचाही दोष नाही.हा काही शिक्षण व्यवस्था,सामाजिक व्यवस्था,आजुबाजूची सांस्कृतिक व्यवस्था किंवा मार्केट व्यवस्थेचाही दोष नाही.तर या दोषाच्या होकायंत्राची सुई तुमच्या बापाकडेच पहिल्यांदा जाते.कारण आपल्या शरीरात आपल्याला घडवणारे -बिघडवणारे अनेक जिन्स असतात.त्यात आळसाचाही जिन्स असतो.हे जिन्स एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, तिकडून पुढच्या पिढीकडे सुखनैव आणि शान आणि अभिमानाने ट्रान्सफर होत राहतात.तेव्हा मुलाच्या आळसासाठी बाप ,बापाच्या आळसासाठी त्याचा बाप अशी ही थोर परंपरा सुरु राहते.हा निष्कर्ष मोरुने वाचला आणि तो थुई-थुई नाचू लागला.त्याने बापाला हा निष्कर्ष वाचून दाखवला तेव्हा तो मोरुकडे कौतुकानं पाहत तोही नाचू लागला.दोघेही मिळून खटल्याला खिळलेल्या मोरुच्या बापाच्या बापाकडे गेले.मोरुने आज्याला हा निष्कर्ष वाचून दाखवला.तेव्हा म्हातारा ताडकन उठलाच नि तोही थुई-थुई नाचायला लागला..आपल्या घरातली काहीच करणारी आळशी पुरुष मंडळी वेड्यावानी कां होईना नाचताहेत ,हातपाय हलवताहेत हे बघून माऊलींनी कुलदैवतेला दंडवत घातला.