Friday, July 27, 2012

कॉपी-बहादूर


कॉपी-बहादूर

   यंदा विविध परीक्षांच्या समयी कॉपीबहादुरांवर विशेष लक्ष ठेवण्यात आलं होतं.तरी सुध्दा काहीशे किंवा काही हजार कॉपी बहादुरांनी पराक्रम गाजवल्याचं दिसून आलचं.या त्यांच्या पराक्रमाला सलाम ठोकायला हवा.पण तसं होत नाहीयना.कॉपी करणं म्हणजे कुकर्म,असं समजलं जातं.ते सुध्दा लहान सहान नाही तर फार मोठ्ठ.म्हणून कॉपी बहादुरांची बातमी मोठी होते.बिचारे बहादूर.

   अहो,कॉपी करणं म्हणजे,बाजरात गेलं नि घेतला भाजीपाला,किंवा मग घेतला कागद नि केलं ला नि ला की झाली कविता.इतकं सोप्प थोडचं आहे,कॉपी करणं. पामेला बोर्डेसनं हेलन किलरची कॉपी केली होती म्हणे.किंवा स्व.देवआनंद कुणा एका ग्रेगरी पॅकची कॉपी करायचं असं त्यांच्या  शेवटच्या श्वासापर्यंत सांगितलं गेलं.किंवा मग स्व.एम.एफ हुसन हे त्यांच्या घोड्याचीच कॉपी अखेरपर्यंत करत राहिले असं सांगितलं गेलं.किंवा मग बिपाशा बसू ही अँजेलिना ज्योलीची कॉपी,कपडयांपासून ते तंगड्या दाखवण्यापर्यंत करते असंही बोललं जातं. म्हणजे नेमकं या ग्रेट मंडळीनी काय केलं हे मात्र कुणी स्वयंस्पष्ट केलं नाही.याचा अर्थ कॉपी करणं म्हणजे काय,याची नीट व्याख्याच अद्याप कुणी करु शकलेलं नाही.

   यशस्वी कॉपी करणं हे यशस्वी जीवनाचा मूलमंत्र होय,असं थॉमस पेन या विचारवंतानं कां लिहून ठेवलं नाहीय,हा प्रश्न पडतो. त्यांचं हे असलं वचन आज सुवर्णाक्षरांनी जगात नोंदवलं गेलं असतं..अपवाद वगळता जगातील श्रेष्ठ आणि कनिष्ठ माणसं सुध्दा कॉपी बहादूर होती या धाडसी विधानाला महेश भट एका क्षणात पाठिंबा देतील आणि त्यावर एक तात्विक प्रवचन टाइम्समध्येही लिहू शकतील.एडिसन महान होताच,पण त्याने शोधलेल्या विद्यूतबल्बची कॉपी करुन ज्याने कारखाना काढला तो त्याच्यापेक्षा महान ठरला नि त्याच्यापेक्षा मोठा झाला.अर्जुनानं द्रोणाचार्याची कॉपी केली नि तो धर्नुविद्देत त्यांचा बाप ठरला.अश्वत्थाम्याला मात्र बापाच्या विद्येची धड कॉपी करता आली नाही नि ब्रम्हास्त्र प्रयोगाच्या वेळेला त्याचे पाय लटपटले.पुढे सर्वनाश झाला.महाभारतातला संजय हा सर्वकालिक श्रेष्ठ कॉपी बहादूर.इतकी सक्सेफूल कॉपी अद्याप कुणालाही करता आलेली नाही.मराठी आणि हिंदी साहित्यातल्या रहस्यकथा या कॉपीच्या अंतरंगातील एकाहून एक रम्य,मनमोहक आणि चित्तथरारक इतिहासाच्या साक्षिदार आहेत.बऱ्याच मराठी नाटकांची कॉपी माधव महानोर यांच्या चाणाक्ष नजरेतून सुटल्या नव्हत्या.भप्पी लाहिरी या कॉपी-नररत्नाचं कौतुक करावं तितकं कमीच.कॉपीच्या बळावर भप्पी अनेक वर्षं आघाडीचा संगीतकार होता,या ऐतिहासिक नोंदिवर अनेकांचं एकमत झालेलं आहे.त्यांच्याच वारसा सध्या प्रीतम नावाचे संगीतकार चालवताहेत नि यशच्या झोपाळ्यावर त्यांच्या झुल्फ्यांसह

झुलताहेत.

   हिंदी चित्रपटसृष्टी ही कॉपीची हिरे-माणिक यांची खाणच होय.या सृष्टीतील कॉपीचा प्रवास चित्तथरारक आहे.हॉलीवूडच्या चित्रपटांची हिंदी चित्रपटसृष्टीनं कशी,कशी कॉपी केली यावर हजारेक ग्रंथ पाडता येऊ शकतातच.पण कालौघात हिंदी चित्रपटांनी आपल्याच चित्रपटांची कॉपी करण्याच्या पराक्रम केलाय .

   असं म्हणतात की,दिलीप कुमार यांनी ओमार शरीफ या परदेशी नटश्रेष्ठाची कॉपी केली नि ते अभिनय सम्राट बनले.अमिताभ बच्चन यांनी दिलीप कुमार यांची कॉपी केली नि ते सर्वकालिक सम्राट बनले.कॉपी प्रकरणातलं सुवर्ण प्रकरण उल्हासनगराचं आहेच की.कॉपीचं महत्व नाकारणं हे ताजमहालाचं सौंदर्य आणि अजिंठा वेरुळचं कवित्व नाकारण्या सारखंचं ठरतं.

   कॉपी बहादुरांची शान एखाद्या योध्यासारखीच असते.कॉपी करणं हे येरागबाळ्याचं काम नव्हे.त्याला सिंहाचं काळीज लागतं.वाघाचं ह्रदय लागतं.कॉपी बहादुरांना त्यांचं धाडसी कृत्य जीव मुठित धरुन पार पाडावं लागतं.पानितपावर मराठ्यांनी जीव मुठित धरुन अब्दालीवर आक्रमण केलं,या विधानाचं गांभिर्य ज्यांना कळेल त्यांनाच कॉपी बहादुरांच्या,जीव मुठित घेऊन कॉपी कृत्य करण्याचं महत्व कळेल.अशीच मंडळी कॉपी बहादुरांचं तोंडभरून कौतुक करतील.आणि ही कॉपी बहादूर मंडळी कशी खंदी राष्ट्रीय वीर आहेत याची खात्री पटून ते त्यांना दंडवत घालतील.

   000

Sunday, April 29, 2012

चोर,संशोधन की प्रियकर ?


चोर,संशोधन की प्रियकर ?

 पुलंच्या घरी चोरांनी कां बरे दरोडा टाकला असेल,असा प्रश्न रमाकांत गोपाळराव देशपांडे कवठेकर-बुद्रुक(आरजीडीके-बी) यांना पडला.ते दक्षिण मुंबईत शोभा डे यांच्या सदनिकेच्या बाजूलाच राहतात.(हे आरजीडीके-बी ,कर सल्लागार आहेत.त्यामुळे लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न असल्याने ते दक्षिण मुंबईत शोभा डे यांच्याच बाजूच्या सदनिकेत राहू शकतात.)त्यांना चिंताग्रस्त झाल्याचे बघून सौ.रश्मी रमाकांत देशापंडे यांनी त्यांना विचारलच.

             अहो चिंता कशाला करताहात एवढी.

             आरजीडीके यांनी वर्तमानपत्रातील पु.लं.देशपांडे यांच्या घरी झालेल्या चोरीच्या बातमीकडे सौंचं लक्ष वेधलं.

             यात कसलं आलय चिंतेच कारण?

            चिंतेचं कारण यासाठी की चोरांनी पु..देशपांडे यांच्या घरी चोरीचा प्रयत्न केला.इथे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पुल देशपांडे राहायचे अशी पाटी दारावरवर लिहिली असताना सुध्दा चोरांनी पु.लंच्या घरी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. कां बरं ,हा प्रश्न मला पडलाय.त्याची चिंता माझ्या चेहऱ्यावर दिसतेय. आरजीडीके-बी म्हणाले.

            मी सांगू का कारणं त्याची?

            व्हाट.. आरजीडीके-बी जोराने ओरडले.तू कशी काय सांगू शकतेस कारणं?तू सुपारी दिली होतीस काय त्यांना?

             काहीतरीच काय हो .. मी फक्त तुम्हाला नि सासूबाईंनाच सुपारी देऊ शकते.मामंजी असते तर त्यांनाही दिली असती.

            बरं बरं..तू जर या चोरांना सुपारी दिली नाहीस,तर मग तू कशी काय कारणं सांगू शकतेस ?

            कां बरं,देशपांडेंच्या बायकोला तेव्हढी तर अक्कल हवीच ना..की नको?या प्रश्नाचं आधी उत्तर द्या मग मी कारणं सांगते.

             टॅक्समधील किचकट प्रश्न सोडणा-या आरजीडीके-बी यांना हा प्रश्न जरा टिकलीश वाटला.अशावेळी ते होकारार्थी आणि नकारार्थी यांच्या मधील मान हलवायचे.आताही त्यांनी तेच केल म्हणाले सांग बरं कारण..

              पुल देशपांडे हे कोण आहेत..सौ देशपांडे यांनी प्रतिप्रश्न केला.

             महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व.

             इथेच तर खरी गोम आहेना..

              ती कशी?

             अहो,महाराष्ट्रात इतकी व्यक्तीमत्व होती आणि आहेत. अंबाणी आहेत,रमेशदेव आहेत,दादा कोंडके होते.अमीर खान आहे.सचीन तेंडूलकर आहे.एटापल्लीचे सरपंच मुकरु एडका कोवा आहेत.माझे सासरे कैलासवासी गोपाळराव कृष्णराव देशपांडे कवठेकर होते.पण पुलच कां लाडके आहेत?हा प्रश्न चोरांना पडला असू शकतो.

            अगं बाई या यादित तू माझ्या वडिलांचा कां समावेश केला?

             अहो ते माझे सासरे आहेत.

             मग काय झालं ..ते आमच्या देशपांडे कुटुंबियात 6 टक्के सुध्दा लाडके नव्हते तर महाराष्ट्राचे कधीपासून झाले..

मी लाडके कुठं म्हंटलं,थोरामोठ्यांची यादी दिली हो...त्यात मांमजींचाही समावेश केला.तुम्ही म्हणता तर मागे घेते त्याचं नाव.

            बरं बरं..पुढे सांगा..

             इतकी सगळी मंडळी लाडक्या व्यक्तिमत्वाच्या पदवीस पात्र असताना एकटेच पुल कां? हा प्रश्न पडून त्या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी मंडळी पुलंच्या घरी शिरली असावी .मला तर वाटतं की ते चोर नव्हतेच.ते संशोधक असले पाहिजेत.

             संशोधक कसे काय?

एखादा प्रश्नाच्या उत्तराचा शोध जो घेतो तो संशोधक असं माझ्या गुरुजींनी शिकवलं होतं.

            अशा संशोधनासाठी गुपचूप रात्रीच्या अंधारात जाण्याची गरज काय मग?

             अहो रात्रीच्या निरव शांततेतच प्रतिभा खुलते.फुलते.एकाग्रिचत्तेची पातळी हाय होते.असं सिध्द झालय ना.म्हणून त्यांनी रात्रीची निवड केली असावी.

            पण पुलंच्या रिकाम्या घरात कसा काय त्यांना शोध लागला असता.

            रिकामं म्हणजे हो काय..काहीच नसनं.म्हणजे शून्य..या विश्वाचा शोध शून्यातूनच लागला ना.संशोधक,साहित्यिक ,लिओर्नादी व्हींची,एम.एफ हुसेन,एसडी बर्मन,हिमेश रेशमिया ही मंडळी जेव्हा शून्यात हरवून जायची किंवा जातात,तेव्हाच्या प्रतिभेला नवे पंख फुटायचे किंवा फुटतत म्हणजे नवं काहीतरी त्यांच्या हाती लागयाचं किंवा लागतं.

             म्हणजे तुला असं म्हणायचं की ते चोर नव्हते.

             त्यांना चोर म्हणून हिणवू नका..अहो प्रेयसीच्या घरी रात्रीच्या निरव शांततेत प्रियकर गेला तर ती काय चोरी ठरते.

             म्हणजे पुलंच्या घरात शिरलेली मंडळी तुला प्रियकरासमान वाटते.

             पुलंच्या साहित्याच्या प्रेमात आकंठ बुडालेले ते प्रियकर राहू शकत नाही का? प्रियकारनं असं प्रेयसिच्या घरी जाणं हे धाडस असतं.त्यातं थ्रिल असतं.ते अनुभवण्यासाठी सुध्दा ही मंडळी गेली असू शकतात,पु.लंच्या घरी.तुम्ही माझ्यावर प्रेम केलं होतं.पण तुम्ही रात्री तर सोडा दिवसाढवळयाही मला भेटण्याच धाडस दाखवू शकला नाहीत ना..सौ देशपांडेनी बाँब्मगोळा टाकला.

            एका देशपांडे यांच्या घरच्या चोरीची चर्चा दुसऱ्या देशपांडेंच्या बुळेपणावर पोहचण्याची शक्यता दिसतातच आरजेडीके यांनी चर्चेवरच पडदा टाकला.
...