Sunday, March 10, 2013

कालाय तस्मै नम:


कालाय तस्मै नम:
   इतकी युगे लोटली.पृथ्वीतलावरील काशीविश्वेश्वारच्या दर्शनासाठीचे नारदेश्वरांचे आगमन कधी चुकले नाही.निसर्गऋतुंचा कोणताही काळ असो.त्याकाळातील कोणताही विकार वा तब्येतीची तक्रार असो,नारदेश्वरांनी ते काही दर्शनासाठी जाण्याचे कारण बनविले नाही.पृथ्वीतलावरील त्यांच्या आगमनात कशीविश्वेश्वर दर्शन ठरलेलच.पण त्यांचे कुणाला काही कौतुकच नाही वाटले कध्धीच की त्याची कधी बातमी नाही झाली.आता आपणास वाटेल की देवाच्या दर्शनाला जाणे ही कशी काय बातमी होऊ शकते बरे.खरेच की,ते तसं व्हायला नकोच.पण झाले काय की कावळा बसला नि फांदी तुटली.कुत्र रडलं नि म्हातारी गचकली.असं बरेचदा होऊन जातं.तसंच नारदेश्वरांच्या बाबतीत झालं.
   परवा परवा ते पृथ्वीतलावर येऊन गेले.तेव्हा त्यांच्या मुक्कामी त्यांनी वर्तमानपत्रात बातमी वाचली नि त्यांचे तोंड सुकले.हेच फळ काय मम तपाला,असेही त्यांना वाटून गेले.देवदर्शनाला कुणीतरी जाणार,हे चमचमित वृत्त संबंधितांच्या चकचकित छबीसह त्या वृत्तपत्री विराजमान होते.नारदेश्वरांच्या चित्तात या वृत्तानं घालमेल सुरु झाली.इतक्या युगांमध्ये त्यांच्याबद्दल असे वृत्त कधी छापून आले नव्हते.ते तर बडे असामी.पृथ्वीतलावरच नव्हे तर आसेतु विश्व म्हणजेच विश्वाच्या दक्षिण टोकापासून ते उत्तर टोकापर्यंत,नैऋत्य टोकापासून ते आग्नेय टोकापर्यंत संचार करण्याची सनद देवादिकांनी केवळ त्यानांच प्रदान केली होती.असे त्यांचे अनन्यसाधारण महत्व असूनही त्याची जाण आणि जाणिव पृथ्वीतलावरील मर्त्य मानवाने ठेऊ नये याची ही घालमेल होती.त्याचे दु: त्यांच्या कोमल ह्रदयास फार टोचले.हे टोचणे काही गुलाबाच्या काट्याच्या टोचण्यासारखे नव्हते.हे टोचणे काही अश्विनीकुमांराच्या इन्जेक्शनच्या सुईच्या टोचण्यासारखे नव्हते.हे टोचणे काही दोरा सुईत टाकताना अवचित सुईचे अग्र करंगळीला टोचण्यासारखे नव्हते.या टोचण्याची जातकुळी ही खांडववनी पांडवांनी निर्मिलेल्या अजब-गजब महाली श्रीयुत दुर्योधन यांची फजिती झाल्यावर श्रीमती द्रौपदी हसल्यावर,श्रीयुत दुर्योधन यांना टोचले,तसे नारदेश्वरांचे झाले.या टोचण्याने ते कावरेबावरे झाले.आपली दखल घेण्याचीही तसदी घेणाऱ्या मर्त्यमानवाचे काय करावे नि काय करु नये असे त्यांना होऊन गेले.पण आपणच काय देवादीदेव इंद्रसेन हे सुध्दा सांप्रतकाली मर्त्यमानवाचे बाल बाँकाही करु शकत नाही,हे वास्तव त्यांच्या ध्यानी येताच त्यांचा चेहराच पडला.त्यांनी त्या पडलेल्या चेहऱ्याने देवर्शनाला अमुक अमुक जाणार,हे चमचमित वृत्त पुन्हा वाचले.नारदेश्वरांपेक्षा अधिक मोठे,महत्वाचे आणि महात्म्य असणारे असे कोण असू शकतं हे जाणून घेण्याची त्यांची उत्सुकता शिगेला पोहचली.अशी उत्सुकता पहिल्यांदा सुश्री मेनका इंद्रप्रस्थी आल्या तेव्हा त्यांचे दर्शन घेण्यासाठी सुध्दा त्यांना झाली नव्हती.
   वृत वाचल्यावर त्यांना कळले कुणी सुश्री एकता कपूर या काशीविश्वेश्वरसूत सिध्दीविनायक यांच्या दर्शनाला जाणार आहेत.या चमचमित वृत्तासोबत सुश्री एकता कपूर यांची चकचकित छबी ठळकपणे प्रगटली होती.ज्यांच्या दर्शनाला जाणार,त्या सिध्दीविनायकाची तरी छबी प्रगटवावी की नाही यावृत्तपत्राने,पण सारेच कसे कलीयुगीचे रामायण.हर हर,नारदेश्वर मनी म्हणाले.त्यांना मर्त्यमानवाची किवही आली.काशीविश्वेश्वर सूत मोठे की ज्या सुश्री त्यांच्या दर्शनासाठी जाणार त्या मोठया?हा सवाल त्यांच्या मनी भुंग्यासारखा भूनभून करु लागला.या प्रश्नाचं उत्तर काशीविश्वेश्वरच देऊ शकतील,असे वाटून ते त्यांच्याकडे गेले.तर ते म्हणाले,नो कॉमेंट .काशीविश्वेश्वर असे कां म्हणाले हे नारदेश्वरांनी नंदीश्वरांना विचारलं ते म्हणाले,कालाय तस्मै नम:
   आपल्या मनीच्या शंकेचे निरसन करण्याचा काशीविश्वेश्वरांचा मूड नसल्याचे नारदेश्वरांनी ओळखले.पण त्यांच्याच्यांनी स्वस्थ बसवेना.ही शंका दूर होईस्तो,स्वर्गी प्रस्थान करावयाचेच नाही असे त्यांनी ठरविले आणि ते थेट काशीविश्वेश्वरसूत सिध्दीविनायकांकडेच पोहचले.मंगळवारच्या दर्शनभक्तीचा थकवा घेऊन चार घडी विश्रांतीस निघण्याच्या तयारीस असणाऱ्या सिध्दीविनायकांच्या समोर नारदेश्वर उभे ठाकले.त्यांना बघून सिध्दीविनायकांनी त्यांचे आशीर्वाद घेतले.येण्याचे प्रयोजन विचारले.आपली शंका नारदेश्वरांनी त्यांच्या कानी घातली.नो काँमेट.सिध्दीविनायक म्हणाले आणि त्यांनी नारदेश्वरांचा निरोप घेतला.शेवटची संधी घ्यावी म्हणून नारदेश्वरांनी मुषकस्वामींकडे आपल्या शंकेची पृच्छा केली.कालाय तस्मै नम:.मुषकस्वामी उद्गारले.नारदमुनी मुषकस्वामींकडे आवासून बघतच राहिले..

पाच कोटीचे मानधन-वास्तव आणि स्वप्न


पाच कोटीचे मानधन-वास्तव आणि स्वप्न
   पुस्तक लिहिण्यापूर्वीच पाच कोटी रुपयांचे मानधन अमीश त्रिवेदी या लेखकरावांना मिळणार,हे वृत्त कानावर पडले आणि मोरु बेशुध्द होता होता राहिला.
   गुंड्याभाऊ म्हणाले,ही लोणकढी फोक आहे.अशा फोका कुणीही ताणायला लागल्या तर फोकांची विश्वासहार्यता डब्ब्यात जायची.
   ही घाऊक भावाची फोक कां बरे आली असेल?
   जळवण्यासाठी?
   कुणाची रे?
   मराठी लेखकांची रे.
   कां बुवा?
   कारण त्यांना धन जवळजवळ मिळत नाही आणि मानही मोजकाच मिळतो.
   काहींना लाखात मानधन मिळाल्याचेही बोलले जाते.
   बोललेच जातेना?कुणीतरी हे बोलणे फॅक्ट आणि फिगर्सला धरुन आहेत का हे तपासले का? तपासले असतील तर त्याचे लेखा परीक्षण केले आहे का?
   म्हणजे रे काय?
   जोपर्यंत लेखापरीक्षण होत नाही,तोपर्यंत खर्च झाला की नाही हे कळत नाही.लेखापरीक्षण झाले म्हणून टू जी स्पेक्ट्रम विक्रीमध्ये अमूल-तमूक लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचं कळलं.तसंच लेखकाला लाखाचे मानधन दिल्याचं लेखापरीक्षण झाल्याचं आपल्यातरी कानावर आलेलंनाही.एकाही वृत्तपत्रानं हा मुद्दा लावून धरला नाही.
   खरेच की! लेखक हे सत्यवचनी असल्याचे त्यांना हा प्रश्न पडला नसावा.
   सत्यवचनाची परफेक्ट व्याख्या अजून कुणी करु शकलेलं नाही.सोइनुसार सत्य बदलू शकते,असं श्रीकृष्णानं अर्जूनाला भर रणांगणामध्ये सांगितल्याचं विसरलास कसे? त्यामुळेच तर धर्मवीर युधीष्ठरही,सोइप्रमाणे सत्य,या सिध्दांताला प्रमाणभूत माणून,नरो वा कुंजरोवा करता झाला.कुणी तरी महाभारताला,हा जय नावाचा इतिहास असल्याचे म्हंटले होते.माझ्या मते तो,सोईप्रमाणे सत्याचा इतिहास आहे.तेव्हा मराठी लेखकांना लाखाचे मानधन मिळते,हे सुध्दा सोईप्रमाणेच सत्य समजले पाहिजे.
   असे जर असेल तर मग लेखकाला पाच कोटी रुपये मानधन हे वृत्त कसे लोणकढी फोक राहू शकते.
   त्याचं कारण असे की,लेखकाला त्याने किती शब्दात लेख लिहिला हे आताआपर्यंत धड सांगता येत नव्हते.शब्दसंख्या मोजता मोजता त्यास फेफरे यायचे.पाच कोटी रुपये मोजता मोजता त्याचे फुफ्फूस फुस्स व्हायचे.लेखकराव शब्दप्रभू असतीलही पण गणित म्हंटले की होतात ना आडवे.
   घेताच आडवे!
   काय घेताच आडवे?असे म्हणणे बरे नव्हे.लेखकराव खुशवंतसिंग कधी आडवे झाल्याचे तू ऐकले आहेस का?लेखकराव विन्स्टन चर्चिल तिरडीवर जाण्यासाठी एकदाच आडवे झाले,पण त्याआधी कधीच नाही.घेतल्याने आडवे होतो, असे शेक्सपिअरला कुणी ऐकवले असते तर त्याने यावर कॉमेडी ऑफ हॉरर लिहिले असते.घेतल्याने नट आडवे होतात.लेखक तररीत होतात.टॉलस्टॉय आडवे झाले असते तर त्याच्या नावाची जपमाळ त्याच्यामृत्यूनंतर इतक्या वर्षांनी आपण ओढली असती का?
   पण हे सगळे लेखकराव मराठी नव्हते.
   पाच कोटी रुपयांच्या मानधनाचे स्वप्नही मराठी लेखक पाहू शकत नाही का? स्वप्न पाहायला अजून तरी बराक ओबामा यांनी बंदी घातलेली नाही.एखादा फतवा निघालेला नाही.स्वप्न ही खाजगी मालमत्ता आहे.त्याच्या उपयोग कसा करायचा किंवा करायचा नाही,याचे स्वातंत्र्य ज्याचे त्याने उपभोगायचे असते.
   तर मग,पाच कोटीचेच मानधन कशासाठी?मानधन दहा कोटीचेही राहू शकते ना.
   राहू शकते की?त्यासाठी कुणी अडवले आहे का लेखकरावांना?कुणीच नाही.मानधनाच्या स्वप्नावर कुणी जळण्याचं कारण नाही. इन्कमटॅक्सची धाडबिड पडण्याचीही भीती नाही.पाच कोटी रुपयांचे मानधन हे जरी मराठी लेखकरावांना स्वप्नवत वाटत असले तरी त्यापेक्षा जास्त रक्कमेच्या मानधानचे स्वप्न पाहण्याचा त्यांचा अधिकार अबाधित आहे.त्या अधिकारावर टाच मारण्याची कुणाची म्हणजे कुणाची सुध्दा अगदी आजच्या काळात तैमुरलंग किंवा चेंगिझखान असता तरी त्यांची हिम्मत झाली नसती.औरंगजेबानं तर तिकडे ढुंकूनही पाहिले नसते.पाच कोटी रुपये मानधनाच्या रक्कमेपेक्षा अधिक रक्कमेच्या मानधनाचे स्वप्न पाहावयाचे की नाही याच विचारात गढून गेलेला मराठी लेखकराव बघून सम्राट रामदेवराय यांनी कपाळावर हात मारुन घेतला असता.सम्राट चंद्रगुप्तांनी गुरुदेव चाणक्यांना अर्थशास्त्राची सुधारित आवृत्ती लिहावयास सांगून ,स्वप्न वास्तव आणि (मराठी) लेखकाचा अधिकार,या विषयावरील 200 पृष्ठांचे परिशिष्ट लिहावयास सांगितले असते.तेव्हा पाच कोटी रुपयाच्या मानधनाच्या वृत्ताने हबकून,हडबडून जाऊन बेशुध्द होण्याची गरजच नाही.त्या अमीश त्रिवेदीला वास्तवात जरी पाच कोटी रुपयाचे मानधन मिळू घातले असेल तर मराठी लेखकांनी स्वप्नात दहा कोटीचे मानधन बघायलाच हवे.वास्तव आणि स्वप्नातील सीमारेषा जेव्हा कधी मिटेल तेव्हा मिटेल.पण मानधनाच्या आकड्याचा आनंद घ्यायला तोपर्यंत हरकत नसावी.हे स्वप्न वास्तवात येण्यासाठी दहा हजार वर्षाचा कालावधी लागू द्या.काळ हा हा म्हणता निघून जातो.1857 ते 1947 ते 2012 हा काळ बघा बघता निघून गेला,हे तर वास्तव आहे ना.वास्तवाला स्वीकारले की स्वप्नपूर्तीची आशा जिवंत राहीलच राहील..