Sunday, September 29, 2013

झुरळांची दूर-दृष्टी

झुरळांची दूर-दृष्टी
      चीन मधील एक कोटी झुरळं पळालित या वृत्ताला समस्त दुनियेनं झुरळ अंगावर पडल्यावर आपण जसं झटकून टाकतो,तसं झटकून टाकलं.त्यामुळे या अद्वितीय आणि अद्भूत घटनेची चर्चा फारशी झाली नाही. माध्यमांना ती घडवावी सुध्दा वाटली नाही.आपल्या रुपयाचं मूल्य घसरत असल्यानं,कदाचित झुरळ पळण्याचं वृत्तमूल्य माध्यममार्तंडना कळलं नसावं.
      थोडी थोडकी नव्हे तर एक कोटी झुरळं पळ काढतात ती सुध्दा अभेद्य अशी ग्रेट वॉल ऑफ चायना असताना.ही एक कोटी झुरळं पळून पळून कुठे गेली असेल बरं. सरड्याची धाव कुंपनापर्यंत.पण,झुरळाची धाव कुठपर्यंत जाऊ शकतं,याचा काहीच आगापिछा नाही. या झुरळांना पळून जाण्याची प्रेरणा कशी मिळाली असेल, हासुध्दा एक प्रश्नच आहे. कारण त्याला आपण घरातील सिंकमधून कितीही  हाकलण्याचा  प्रयत्न  केला  तरी  ते पुन्हा तयारच असतात. हिटचा मारा दररोज करुनही ते त्यास दाद देत नाही. बळी पडतात. पुन्हा सकाळच्या रामप्रहारी वाकुल्या दाखवायला तयार.हे या झुरळांचं,मरते है शानसे आणि वाकुल्या दाखवते है शानसे  असं ऍ़टिट्यूड आहे.चिनमधल त्या एक कोटी झुरळांना हा ऍ़टिट्यूड नसावा का?
.याचा अर्थ त्यांनी फक्त शानसे मरावे असा नाही.मरावे परी कीर्तीरुपे उरावं,असाही आग्रह धरणं योग्य नव्हे.
      झुरळांच्या ऍ़टिट्यूडचा त्यांना ठाऊक नसलेला दुसरा गुणधर्म असा आहे की]ते पळ काढण्याऐवजी मनुष्यप्राण्यास पळता भूई थोडी करण्याची क्षमता ठेऊन आहेत.मनुष्यप्राणी जन्मास येण्याआधी झुरळाचं अवतार कार्य या पृथ्वीतलावर सुरु झालं होतं.कोट्यावधीवर्षांपूर्वीचा झुरळ आणि आजचा झुरळ यात कसलाही बदल झाला नाही. पृथ्वीतलावर आलेल्या अनंत युगांचा त्याने सक्षमपणे सामना केला आहे.पृथ्वीचा चेहरा बदलला. होत्याचं नव्हतं होण्यापर्यंत या बदलांनी वाटचाल झाली पण झुरळ मात्र जैसे थेच.
      या पृथ्वीतलावर तो मानवाला सिनियर आहे.त्याची त्याला जाणीव असल्यानेच तो मनुष्यप्राण्याच्या नाकावर टिच्चून सर्वत्र संचारी आहे.एक सुध्दा झुरळ माझ्या महाली सापडणार नाही असं ठामपणे मुकेश अंबाणी सांगू शकणार नाहीत.या विवेचनाचा अर्थ असाच की  पळून जाणं हा झुरळांच्या वृत्तीचा भाग नाही.
      त्यामुळे ते समुहाने पळून गेले.असं सांगणं हा त्यांच्या बदनामीचा कट तर नसावा ना!तसं जर असेल तर,हा कट कुणी केला असावा?त्यांचं मनोधैर्य कमी व्हावं हा तर कुटील डाव नसेल?असंख्य मोहिमा फत्ते केलेल्या चंगेजखानाच्या सैन्याचं मनोधैर्य खालवावं यासाठी खोटेनाटे प्रयत्न केले जाऊन,त्यास एका लढाईत प्रत्यक्ष भाग घेताही पराजयाचा सामना करावा लागला होता.झुरळांच्या बाबत हीच नीती तर अवलंबण्यात येत नाही ना!पण असं कां बरं व्हावं?
      एक कोटी झुरळांचं पळून जाणं हे छळछावणीतून पळून जाणाऱ्या सैनिकांसारखं नाही.झुरळांचा छळ होतो हे मान्य केले तरी या छळासाठी ते सदैव तप्तरच असतात हे सुध्दा खरच.ही वस्तुस्थिती लक्षात घेता झुरळांचं पळून जाणं ही दुर्लक्षणारी घटना नव्हे.
      आम्हास तर दुसराच संशय आहे की,सध्या मनुष्य प्राण्याचं मंगळावर आणि चंद्रावर वास्तव्य करण्याचं फार चाललय.मोठमोठी यान तयार होत आहेत.बुकिंग सुरु झाली आहेत.तिकडे वसाहती कशा-कधी -किती होतील याची गणित मांडली जात आहेत.सवर्त्रसंचारी झुरळांच्या मिशांना याची जाणीव तर झाली नसेल ना? समजा तसं असेल तर
झुरळांच्या पळून जाण्याचा अर्थ स्वयंस्पष्ट आहे.ते पृथ्वीतलावर पहिल्यांदा अवतरले.हाच सन्मान त्यांना मंगळ वा चंद्रनिवासी होऊन प्राप्त करावयाचा तर नाही ना?

      मनुष्यप्राणी जेव्हा कधी मंगळ आणि चंद्रावर वास्तव्याला जाईल तेव्हा त्याच्या स्वागताला झुरळ अटेंशनमध्ये उभे राहतील.कदाचित हेच कारण असू शकतं या एक कोटी झुरळांचं पळून जाण्यामागचं.त्याला आपण पळून जाणं,कां म्हणतो.ते तर दूरदृष्टिने केलेलं स्थलांतरच असलं पाहिजे.(झुरळांचा विजय असो.)

Sunday, September 15, 2013

शौचनीय सभा

शौचनीय सभा
    रावसाहेबांना कुणी नाही म्हंटलेलं कधी आवडायचं नाही. हे सगळयांना चांगल्याच ठाऊक झालं होतं. बॉस मंडळी त्यानांच कोणताही कार्यक्रम, सभा आयोजित करण्याची जबाबदारी सोपवित. त्यात त्यांना अद्याप तरी अपयश आले नव्हते. विशेषत: जिल्हाधिकाऱ्यांच्या वतिने बोलावलेल्या सभांना गर्दी झाली नाही  असे कधीच झाले नाही.
    अशा या रावसाहेबांची ही ख्याती लक्षात घेऊनच त्यांच्या संघटनेने त्यांना आपले सरचिटणीस बनवले. हेतू हाच की संघटनेची बैठक जेव्हा जेव्हा बोलावली जाईल तेव्हा तेव्हा त्याला गर्दी होईल. पूर्ण कोरम भरेल. सभागृह तुडुंब भरुन वाहू लागेल. प्रत्येक सभा यशस्वी होईल आणि संघटनेचाही दबदबा वाढेल. रावसाहेबांना तर हे डाव्या नाकपुडीतील पांढरा केस झरदिशी ओढून फेकून देण्याइतपत सोप्प सोप्प वाटलं.
    पहिली बैठक  बोलावण्याची सूचना अध्यक्षांनी त्यांना केली. रावसाहेब कामाला लागले. सभेचा दिवस उगवला. सभेची वेळ आली. मात्र पहिल्यांदाच विपरित घडत होते .सभेची नियोजित वेळ होऊनही पाचही सदस्य आले नव्हते.
रावसाहेबांच्या संघटन कौशल्याचा फुगा टचकन फुटला. जिल्हाधिकाऱ्याच्या नावावर रावसाहेब उड्या मारत होता. आयजीच्या जीववार बायजी मजा करत होता. बेडूक उड्या मारुन मारुन किती मारणार. बेडकाला बैल झाल्याचे स्वप्न कोणे एके काळी पडले होते. पण स्वप्न ते स्वप्न .बैल बैलाच्या जागी राहिला. बेडूक त्याच्या चिखलाच फसला. असं काही बाही रावसाहेबांबाबत पब्लिक बोलू लागले. सिंहाचं कातडं पांघरलेलं गाढव होतो आपण,असं खुद्द रावसाहेबांनाही वाटलं. एकाच वेळी आपण सिंह, गाढव,बैल आणि बेडूक या चार प्राण्यांच्या रुपात लोकांना दिसू शकतो याचं त्यांना हसूही आलं. पण ते कच्च्या गुरुचे चेले नव्हते. सिंहांचं कातडं घातल्यावर  गाढवाला सिंह झाल्यासारखे वाटले होते. पण त्या गाढवाला कधीच सिंहाचा सहवास लाभला नव्हता. त्याने कायम सिंहाला दूरुनच बघितले होते. हे लोक कां विसरतात? मात्र आपले तसे नाहीना. आपण सिंहाच्या मांडिला मांडी लावून बसतो. सिंह त्याचं माईंड आपल्यासमोर खुल करतो. एवढा विश्वास आपण कमावलाय. हे सुध्दा कुठे ठाऊकाय लोकांना. तो गाढव इसापनीतीतला होता. हा गाढव प्रॅक्टिकलनीतीतला. आता बघाच म्हणावं, कोल्हेकुई करणाऱ्यांना. सिंहाचं कातडं ओढताही गाढव काय चमत्कार करतो ते.रावसाहेब स्वत:लाच म्हणाले.आणि पुन्हा उत्साहाने कामाला फसफसले.
    000
    एके दिवशी अधिकाऱ्यांकडे बैठकीची नोटीस आली. प्रत्येक कार्यालयात असणाऱ्या किंवा नसणाऱ्या शौचालयाचा आढवा या बैठकीत घेतला जाणार होता. सर्वोच्च न्यायालयाला ही माहिती तातडीने पुरवायची होती .नाहीतर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ठरलेलाच.
    ही नोटीस जाता अधिकाऱ्यांनी धावत पळत जाऊन कार्यालयातील शौचालयाची तपासणी केली. काहींना हायसे वाटले. काहींना बायसे वाटले. काहींना रडावेसे वाटले. काहींना कसेसेच वाटले. तर काहींना हेच काय मम तपाला म्हणत तेथेच मरावेसेही वाटले. याचा अर्थ बहुतेक अधिकाऱ्यांना काहींना काहीना तरी वाटलेच होते. हे आपले वाटणे त्यांनी बाजूला ठेऊन शौचालय अहवाल तयार केला आणि बैठकीच्या दिवशी मोठ्या उत्साहाने ते पंधरा मिनिटे आधीच सभागृहात हजर झाले.
    बैठकीची अधिकृत वेळ होताच रावसाहेब उठून उभे राहिले आणि त्यांनी थेट संघटनेच्या बैठकीचा अजेंडा समोर ठेवला. आणि शौचालय बैठक निमित्तमात्र असल्याचे स्पष्ट केले. रावसाहेबांनी उल्लू बनवल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. रावसाहेबांच्या चेहऱ्यावर मी ,सिहांचं कातडं पांघरेला गाढव नसून रावसाहेबच आहे. सिंह नसलो तरी सिंहासारखाच..असे भाव उमटले. अनेक अधिकाऱ्यांनी हे भाव ओळखून त्यांनी रावसाहेबांना सॅल्यूट ठोकला तर काही अधिकाऱ्यांचे चेहरे तीन दिवस शौच झाल्यावर जसे होतात तसे झाल्याचे रावसाहेबांना दिसले..ते मनी खुष झाले आणि त्यांनी बैठक दणक्यात सुरु केली..


2