Sunday, October 6, 2013

महाराज सुध्दा बायकोस भ्यायचे..

महाराज सुध्दा बायकोस भ्यायचे..
सकाळी सकाळी प्रधानजीकडे महाराज धावतच पोहचले.हे दृष्य उभ्या आयुष्यात प्रधानजींनी बघितले नव्हते.कारण धावायची पाळी त्यांचीच असायची.राजाकडे सगळयांनी धावायचे.राजाने नव्हे.त्यामुळे महाराज दिसताच प्रधानजींनी नैऋत्य दिशेकडे बघितले.आज सूर्य तिकडून तर निघाला नाही ना,याची खात्री करुन घेतली. तसे काही घडले नव्हते.सूर्य पूर्वेकडूनच उगवला होता.मग आज हे असे झाले कसे? रात्री महाराजांचे द्राक्षासव पेय प्राशन अतिरिक्त तर झाले नसावे ना?अशी शंका प्रधानजींना आली.पण ते नित्याचेच होते.त्यामुळे फार तर महाराज एक्स महाराणींच्या महालाकडून वाय महाराणींच्या महालाकडे धावले असते.प्रधानाकडे नव्हे.मग असे झाले कसे? पण आता विचार करण्यासाठी वेळ उरला नव्हता. महाराजांनी प्रधानजींना मुजरा करण्याची सुध्दा संधी देता चक्क मिठीच मारली. त्यांनी कसे बसे महाराजांच्या मिठीतून आपल्याला सोडवून घेतले आणि कुर्निसात घातला. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचा ऍ़टमबॉब्मच फुटला होता.त्यामुळे त्यांच्या तोंडून शब्द फुटेना. महाराजांनी त्यांची ही अवस्था ओळखली आणि प्रधानजींना आसनावर बसवत महाराज म्हणाले.
प्रधानजी रिलॅक्स व्हा.मला तुमच्या घरी बघून असे बावचळून जावू नका.कधी कधी राजाने प्रजेच्या घरी जावे असे आमच्या पिताश्रींनी आम्ही पाच वर्षाचे असताना मार्गदर्शन केले होते.पण तशी संधी मिळत नव्हती. ती आज मिळाली. त्यामुळे आज आम्ही तुमच्याकडे धावत आलो.तुम्हाला वाटले ,सूर्य वायव्य दिशेकडून तर उगवला नाही ना. पण प्रधानजी घटनाच अशी घडली.आज आम्ही खूप खुष आहोत.त्यामुळे राहवून तुमच्याकडे धाव घ्यावीशी वाटली.
महारांजाचे बोलणे सुरु असताना प्रधानजींनी दीर्घ श्वास घेतला.आणि स्वत:चे बावचळलेपण मोठया कष्टाने दूर सारले आणि आणि विचारलं,महाराज एव्हढं घडलं तरी काय,सूर्य उत्तर दिशेला उगवण्यासारखं..म्हणजे ,महाराजांना आमच्याकडे धाव घेण्यासारखं..
प्रधानजी,आम्ही सारे काही सांगणारच आहोत.आज आमच्या मनावरचे दडपण एकदम संपून गेले आहे.
महाराजांवर काही दडपण असल्याचे आम्हास इतक्या वर्षात दिसले नाही.आटपाट नगराच्या राजावर दडपण याचा अर्थ आपल्या राज्यात सूर्य दक्षिणेकडून तर उगवत नव्हता ना..
प्रधानजी,तुम्ही कुठली गोष्ट कुठे नेऊ नका.अहो,आटपाट नगराजा राजा असो नाही तर चक्रवर्ती सम्राट असो.काही अंदर की बातेचं दडपण त्याच्यावर असतं.ते केवळ त्यालाच ठाऊक असतं.तो कशाला त्याच्या प्रधानाला सांगेल.
मग महाराज,आज सूर्य पश्चिमेकडून तर उगवला नाही ना..
नाही प्रधानजी, सारखं आपलं सूर्य सूर्य करु नका.
मग,एव्हढे काय घडले असे की,आपली अंदर की बातचं दडपनच संपून गेलं..
प्रधानजी,आजपर्यंत आम्ही या दडपणाखाली होतो की केवळ  आम्हीच आणि आम्हीच आमच्या महाराणिंना भीत होतो.
मग आता काय झालं?
प्रधानजी,अहो श्रीयुत बराका ओबामा सर, सुध्दा त्यांच्या सौभाग्यतिंना भितात,असं त्यांनी स्वत:कबूल केलय.
म्हणजे ते चक्रवर्ती सम्राट,सर ओबामा..
होय तेच.ते भीतात..तर मग मी किस झाड की पत्ती.केवळ एका आटपाट नगराचा राजा.महाराणिंना आम्ही भितो याच दडपणाखाली आमचं निम्म आयुष्य गेलं.फक्त दाखवलं नाही .पण मनात मनात मात्र आम्ही बायल्या आहोत,असंच वाटत राहिलं.फार स्ट्रेस होता हो प्रधानजी याचा.पण चक्रवर्ती सम्राटांनी एका क्षणात आमच्या डोक्यावरचा ताण दूर केला.
खरय महाराज. प्रधानजीसुध्दा आता पूर्णपणे खुलून म्हणाले.
होय ना.प्रधानजी,बघा म्हणजे आम्ही आमच्या राणिंची भीती घेऊन इतकी वर्षं उत्तम राज्यकारभार केला की नाही.
होय महाराज ...
मग तुम्ही आम्हाला जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवायला हवे की नको..
होय महाराज.प्रधानजी नम्रपणे म्हणाले. खूष होऊन महाराजांनी आपल्या महालाकडे प्रस्थान केले.
सूर्य जरी पूर्वेलाच उगवला होता तरी प्रधानजींना मात्र ती दिशा इशान्य वाटू वागली..
000


Wednesday, October 2, 2013

झुरळं त्यांच्या कर्माला नि आपण आपल्या कार्याला

झुरळं त्यांच्या कर्माला नि आपण आपल्या कार्याला
       चीन मधून पळून गेलेल्या एक कोटी झुरळांच्या बाबत असं घडू शकत नाही का?
       असं बघा की,एक आटपाट नगर आहे. त्या नगरात एक थोर राजा राज्य करीत आहे. त्या थोर राजाला तितकीच थोर राणी आहे. राणीला नुकतच डोहाळे लागले आहेत. ती राणी असल्याने तिला कशाचेही डोहाळे लागू शकतात.सामान्यांच्या बायकांसारखे चिंचोके ते बोरचारं राणीला कसे चालणार? ते राणीपदाला शोभणार सुध्दा नाही. त्यामुळे राणीला डोहाळं लागले ते झुरळाच्या पिठल्याचं किंवा झुरळांच्या लोणच्यांचं किंवा झुरळाच्या भरिताचं किंवा झुरळ-बिर्याणीचं किंवा झुरळ-थेलपाचं किंवा झुरुळू रोटीचं.म्हणजे समथिंग खाद्यपदार्थ वुइथ फ्लेवर ऑफ झुरळ.
       थोर राजाला हे जेव्हा कळलं तेव्हा त्याला स्वाभाविकच थोर राणीसरकारांचा अभिमान वाटला. कारण त्याच्या राजघराण्यातील सत्तावीस पिढयांमधील राणीसरकारांना असे डोहाळे लागल्याची कोणतीही खबर त्यांच्या बखरीत नोंदवली नव्हती. थोर राजाला राणीसरकारांना कुठे ठेऊ नि कुठे नाही असे झाले. त्यांनी तत्काळ स्वत:ला राणीसरकारांसमोर पेश केले. राणीसरकारांनी लाडिकपणे डोहाळ इच्छा थेट राजांच्या डोळयात बघत व्यक्त केली. राणीसरकारांच्या दोन्ही हातांचे चुंबन घेऊन राजाने,त्यांना ही इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले.पुढचं झुरळांच पळून जाण्याचं रामायण एव्हाना आपणास चांगलेच ठाऊक झाले आहे.
        राणीसरकारांच्या डोहाळयांसाठी एखाददुसऱ्या झुरळाने कसे व्हायचे. त्यासाठी एक कोटीच झुरळं हवीत. ही एक कोटी झुरळं अनायसे होतीच.थोर राजाने ती बरोबर हेरुन पळवून नेली. या घटनेस झुरळ पळून गेल्याचे नाव दिलेही खरे तर मोठी काँन्स्पिरसी ठरते.असू द्या.आपलं काय जातं.
       थोर राजा,त्यांच्या राणीसरकार आणि झुरळ फ्लेवर डिश हे एक स्वतंत्र प्रकरण आहे. पुढे खरोखरच असं झालं असेल का?हा थोर राजा मध्येच कसा उपटला? त्याने एक कोटी झुरळांना पळवण्याचा पराक्रम एकटयाने गाजवला की विश्वासू सैन्याच्या मदतीने त्याने हल्ला केला.याचा शोध घ्यायला हवा.
       असा शोध घेण्याची जबाबदारी हॉगवर्टस्थित मॅजिक स्कूलला देण्याचं सुचवायला हवं. याच हॉगवर्टमध्ये हॅरी पॉटर मॅजिक शिकायला गेला होता.आठवतय का? पावने दहा क्रमांकाच्या फलाटावरुन थेट ट्रेन जाते हॉगवर्टला. तिथे व्हॉल्डोमोरचा प्राण अजुनही घुटमळतोय आणि हॅरी पॉटर आणि त्याच्या मित्रांची मुलं जादू शिकताहेत. त्यांना एक कोटी झुरळांचं पळून जाणं किंवा थोर राजानं या झुरळांना पळवून नेणं यांचा अन्योन्न संबंध जोडणं योग्य की अयोग्य हे शोधून काढण्याचं असाइनमेन्ट द्यायला हवं.
        थोर राजा आणि राणी सरकारांच्या नावाने ही थिअरी पसरवून त्या एक कोटी झुरळांच्या पळून जाण्याचा प्रकरणावरुन लक्ष विचलित करण्याचा कुणाचा डाव तर नसेल ना हा! अशा विविध थिअरी किंवा सिध्दांत सतत बाहेर पडून संशय गडद होण्याची शक्यता लक्षात घेता झुरळांमधील ज्येष्ठ भ्राताने समोर येऊन वस्तुस्थिती विदित करुन टाकावी.
       झुरळं कुठेही गेले नाहीत. हिमालयातील असंख्य तीर्थक्षेत्रांच्या दर्शनाची मेरीगोल्ड यात्रा सुध्दा सुरु असू शकते त्यांची. हिमालय परिक्रमा करण्याचा त्यांनाही मोह होऊ शकतो.एव्हरेष्टवर त्यांच्या पूर्वजांच्या तिसऱ्या पिढीच्या स्मारकाला सुध्दा ते भेट देऊ शकतात. किंवा एखाद्या विपश्यना केंद्रात सुध्दा ध्यानधारणेसाठी ते जाऊ शकतात की. ध्यानाची गरज केवळ मानवाला आहे आणि झुरळाला नाही, हे काही कुणी अद्याप सांगितलेलं नाही. सांगितले असेल तरी त्यास काही पुरावा नाही. एक कोटी झुरळातील ज्येष्ठ भ्राताश्रींनी याविषयी सविस्तर विवेचन केले की संपलेच ना सारे...
झुरळं त्यांच्या कर्माला नि आपण आपल्या कार्याला.(इती श्री झुरळपुराणे तृतीयाध्याय आणि अंतिम अध्याय समाप्त.)
0000