Saturday, June 29, 2013

राजपुत्राचा नातेवाईक..फुकटातला आनंद..

राजपुत्राचा नातेवाईक..फुकटातला आनंद..
   ब्रिटनचे राजपूत्र चार्लस यांचा लेक प्रिन्स विल्यम हा भारतीय वंशाचा असल्याचा शोध डीएनए संशोधकांनी लावल्याचे वृत्त आले आणि आमच्या घरी आनंदोत्सव सुरु झाला.आमच्या सौभाग्यवतीनं सगळया कॉलनीस पेढे वाटले.संतोषी मातेच्या मंदिरात जाऊन नारळ फोडला.तिच्या चेहऱ्यावरचे तेज नुसते ओसंडून वाहत होते.
   मला पहिलं प्रमोशन मिळालं तेव्हा सुध्दा तिला इतका आनंद झाला नव्हता.तिच्या बहिणीला फॉरेनमध्ये मोठया कंपनीत नोकरी करणारा नवरा मिळाला तेव्हा सुध्दा तिला एवढा आनंद झाला नव्हता.आमचे सासरे पंचायत समितीचे सदस्य झाले तेव्हा सुध्दा हिला एवढा आनंद झाला नव्हता.मग आताच अनलिमिटेड आनंद होण्याचे काय बरे कारण असावे?मी अनंत बाबींची उलट सुलट जुळवणी करुन बघितली.पण माझ्या प्रश्नाला उत्तर मिळण्याऐवजी ते प्रश्न आयपीएल फिक्सिंच्या प्रश्नासारखे अधिकाधीक गडदच होत गेले.अखेर राहावून मी माझी शंका तिच्यासमोर ठेवलीच.
   तरी मला कालपासून वाटतच होतं की,यांचा उंट अजूनपर्यंत कसा हलला नाही.सौभाग्यवती कुत्सितपणे म्हणाल्या.असे प्रसंग जेव्हा जेव्हा येतात तेव्हा ती माझा उध्दार प्राणी जगतातील  उंट हत्ती,घोडा,अस्वल अशा श्रेष्ठ आणि जेष्ठ प्राण्यांच्या उदाहरणानेच कां करते हे कोडे मला अद्यापही सुटलेले नाही.या प्राण्यांना जर यदाकदाचित त्यांचं आणि माझं असं रिलेशिनशिप जोडलं जातं हे कळलं तर ते नक्कीच पाच-पन्नास दिवस डोळे बंद करुन मौनातच जातील.
   सौभाग्यवतींनी मला उंटाची उपमा दिली असती किंवा उंदराची  दिली असती तरी मी कमल कपूर सारखं हॅ हॅ हॅ केलं असतं.तसं मी करुन तिच्यापुढे संपूर्ण शरणागती पत्करली.
   त्यामुळे सौभाग्यवतींचा आनंद मंगळाएवढा झाला.
   प्रिन्स विल्यमचा डीएनए भारतीय निघाला याचा तिला झालेल्या आनंदाचं कारण तिने विदित केलं.तिच्या म्हणण्याप्रमाणे, हे कधीना कधी होणारच होतं.(कसं ते मात्र मी तिला विचारण्याची हिम्मत करु शकलो नाही.)कारण त्याचे घारे निळे डोळे(ते तर कपूर खानदानाचे सर्वात मोठे वैशिष्ट आहे.),कारण त्याची उंच (बच्चन खानदानीची मक्तेदारी आहे.) त्याच्या गालावर पडणारी खळी,(अशी खळी दीपिका पडुकोन आणि शाहरुख यांच्या गालावरही पडते.)कारण त्याचे कुरळे केस (सचीन तेंडूलकर आणि आमचे बॉस मोहनराव वनारसे यांचेही केस कुरळेच आहेत की.)कारण त्याचे रुंद कपाळ,त्या कपाळावरील स्पष्ट दिसणाऱ्या रेघा (आठ्या),चाफेकळीसारखे लांबोळे नाक, नाकावरील फुटकळी (हिला कधी आणि कुठे दिसली?)खांद्याची ठेवण,चालण्याची ढब सारे काही सारे काही..सांगता सांगता सौभाग्यवतीला दम लागला.सांगण्याचा उत्साह मुंबई मॅराथॉनच्या शेवटच्या टप्प्यावर पोहचल्यावर जसा स्पर्धकांचा होतो तसा झाला होता.तो उत्साह तसाच कायम ठेवत मी सौभाग्यवतीस पुढे बोलते केले..
   ती म्हणाली,सारे काही माझ्या माहेरच्या माणसारखेच हो..प्रिन्स विल्यमचा डिएनए भारतीय निघाला पण भारतीय म्हणजे कोण,तामीळ,मल्याळी,केरळी की आपला महाराष्ट्रीय,हे महत्वाचं नाही का?त्यामुळे मीच काल रात्रभर प्रिन्स विल्यिमचा फोटो नि माझ्या माहेरच्यांचे फोटो निरीक्षण करीत होते.पाच तासाच्या सुक्ष्म निरीक्षनानंतर प्रिन्स विल्यमचा डीएनए महाराष्ट्रात येतो नि तिथूनही तो माझ्या माहेरच्या घरापर्यंतच पोहचतो बरं का.हे सूर्यप्रकाशाच्या पहिल्या किरणासारखं स्पष्ट झालं.सौभाग्यवतीनं अतिव आनंदात सांगितलं..
   मी तिच्याकडे बघतच काय राहिलो.माझ्याच्याने शब्दच सुचेना. प्रिन्स विल्यिमची नाळ बायकोच्या माहेरी जर जातच असेल तर त्याच्या नात्यात मी सुध्दा नाही का येणार?
   राजपुत्राचा नातेवाईक,या व्हर्च्युएल आनंदाच्या डोही मीही तरंगू लागलो.महागाईच्या काळात असा फुकटातला आनंद मनावला काय हरकत आहे,नाही का?
00


मार्क व्टेन आणि श्रीशांत

   मार्क व्टेन आणि श्रीशांत
    विनोदी लेखनासाठी सुप्रसिध्द असलेले आणि तिरकस रिमार्कसाठी कुप्रसिध्द असलेले मार्क व्टेन एकदा सहज म्हणून गेले , काही पुस्तकं अशी असतात की जी लेखकास शब्दबद्द होऊ देण्यास तीव्र नकारघंटा वाजवतात.त्यांच्या पाठिमागे प्रेयसीच्या पाठिमागे लागणार नाही इतका लेखक लागतो,मनधरणी करतो,पण ही पुस्तकं ढिम्म हलत नाही.गदागदा हलवली तरी डुलत नाहीत,किती खरं बोलले नाहीत का हे व्टेन महोदय.
    आता हेच बघा की जर श्रीशांत यांच्या करकमलांद्वारे नुकत्याच घडून गेलेल्या पराक्रमावर पुस्तक पाडण्याची लेखरावांना इच्छा झाली तरी ते पुस्तक त्यास तयार होईल का?जेम्स बाँडचे पराक्रम काल्पनिक होते.म्हणून ते कागदावर आले नाहीत तर इआन फ्लेमिंगला जेम्सची सारीच लफडी माहीत होती.त्यामुळे पारदर्शकता होती.त्यातूनच शब्दांना कथेचा फॉर्म मिळाला.श्रीशांत यांनी पराक्रम गाजवला.पण त्याचं त्यांनाच म्हणे कळेना हा पराक्रम त्यांच्या हातून घडला की कुणी तरी बाहुलीने त्यांच्या हातून घडवला?शिवाय ही बाहुली एक,दोन की तीन तसेच मराठी,पाकिस्तानी की झुमरीतलैयानिवासी हेही गुलदस्त्यात.
    पोलिसांना वाटतं कुणी एक पॉवरफूल बाहुलाच श्रीशांत यांना नाचवत होता.झंपिंग झपॅक म्हणत शाहरुख खान ते माधुरी दीक्षित ते कटरीना हीस फराह खान नाचवू शकते.पण बाहूला हा काही नृत्य दिग्दर्शक नाही.किंवा होऊ शकत नाही.तसेच रेमो फर्नांडिस किंवा प्रभुदेवाचं हे टोपणनाव सुध्दा नाही.जर नाचायचे होते तर श्रीशांत कां बरे क्रिकेट खेळत राहिले?डान्स इंडिया डान्स, नच बलिए  होतेच की त्यांच्यासाठी. श्रीशांतने राहूल महाजनांना एक एसएमएस केला असता तरी त्यांनी या कार्यक्रमांचे पत्ते - फोन-ईमेल-वेबसाइट,फेसबूक ऍ़ड्रेस सारं धाडलं असतं.विनोद कांबळी सुध्दा एका डान्स शोमध्ये झंपिंग झपॅक करुन आले होते,त्यांचेही बहुमोल मार्गदर्शन मिळालं असतं.पण तसे झाले नाही.याचा अर्थ पाणी नक्कीच मुरतेय.हे पाणी बिसलरीचे की की रावी नदीचे हे मात्र गुलदस्त्यात आहे.
    श्रीशांत यांनी त्यांच्या मैत्रिणीला 40 हजाराचा मोबाइल दिला असं सांगितलं जातं.पण मोबाइल चाळीस रुपयांचाही राहू शकतो. उल्हासनगरचा असेल तर चारशे रुपयांचा राहील.मेड इन चीन असेल तर किंमत गुलदस्त्यात राहील.चाळीस हजार आकडा संशयास्पदच.चाळीस लाख कां नाही?चाळीस लाखाचा मोबाइल ही जरा अवास्तव कल्पना झाली असं आजच्या जगात कुणी म्हणूच शकत नाही.आठ लाखाचंही घर असतं आणि आठ हजार कोटी रुपयांचं घर असू शकतं हे आपणा सर्वांनाच माहीत नाही का?
    श्रीशांत यांच्या राहण्याची सोय केलेल्या हॉटेलमधील रुमशिवाय त्यांनी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेसमध्ये असणाऱ्या एका हॉटेलमध्ये रुम बूक केल्याचं सांगितलं जातं.हे हॉटेल मिठी नदीच्या परिसराच्या आजुबाजूला आहे.समजा श्रीशांत यांची सामाजिक जाणीव जागृत होऊन मिठी नदीचा गाळ आणि घाण दूर करण्याचे त्यांनी मुंबई मुक्कामी ठरवलं असेल तर? या कामासाठी किती खर्च येऊ शकतो हे बघण्यासाठी मिठी नदीच्या जवळपासच्या हॉटेलमध्ये राहण्याचे ठरवलं असेल तर? या नदीची पाहणी रात्रीच व्यवस्थित होणार की नाही?हे वास्तव जर ध्यानात घेतले तर श्रीशांत हे योग्य मार्गीच होते असं म्हणता येऊ शकतं..पण वास्तव आणि वस्तुस्थिती समोर येणार कशी? हे जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत पुस्तक कसं बरं शब्दांचं स्वागत करेल?मग ते पुस्तक सलीम-जावेद यांनी लिहायला घेतलेलं असो किंवा जेम्स हेडली चेसने किंवा चेतन भगतने लिहायला घेतलं असो, त्याने काहीच फरक पडत नाही.
    मार्क व्टेन किती अचूक बोलून गेले, नाही का?
    000