Sunday, April 14, 2013

लाडक्याला शब्दसुमने,दोडक्याला शब्दाचा मार


लाडक्याला शब्दसुमने,दोडक्याला शब्दाचा मार
   आम्हाघरी शब्दे रत्नेची खाण,असं तुकाराम महाराजांनी उगाच कां म्हंटले असावे? शब्द हे धनापेक्षा मोठे आणि शस्त्रापेक्षा धारधार असते. मयसभेतील द्रौपदीआक्कांचे शब्दबाण श्रीयुत दुर्योधनाच्या किती जिव्हारी लागले.द्रौपदीआक्कांनी त्यावेळी धनुष्यबाणाचा वापर केला असता तर कदाचित श्रीयुत दुर्योधन यांनी हसत हसत तो वार झेलला असता.महाभारतही टळले असते.सासू आणि सुनेच्या अमरकथा या अजरामर होण्यासाठी शब्दांचाच हातभार लागलाय.नागराजाच्या मुखी असलेलं जहर अधिक विषारी की सासू आणि सुनेच्या मुखीचे शब्द अधिक जहरी यावर कुणी संशोधन अजून तरी कां बरे केलं नसावं?
   शब्द तेच असतात पण कालीदासानं वापरले की त्याचे साहित्य होते.आपण वापरयाला गेलो तर त्याचे हसे होते.शब्द तेच असतात पण अमिताभ बच्चन यांनी वापरले की ते बुलंद होतात,शाहीद कपूरने वापरले की फुस्स होतात.आनंद बक्षी यांनी वापरले की ते ला , ला असं फालुदा टाईप गाणं होतं.गुलजार यांनी शब्द वापरले ते आशयनघन कविता होतात.हेलनकाकूंसाठी असलेले शब्द कॅबेरे होतात.करीना कपूर-खान यांच्यासाठी हेच शब्द आयटेम साँग होतात.
   शब्द तेच पण त्याच्या छटा मात्र अमेरिकेत वेगळया,चिनमध्ये वेगळया,पाटण्यात वेगळया,मुंबईतल्या बांद्रापूर्व मध्ये वेगळया आणि लोअर परळ मध्ये वेगळया.कुणाची शब्दांवर हुकूमत असते.म्हणजे तो म्हणेल तसे शब्द वाकतात,चालतात.धावतात.कधीकधी बराच गोंधळही करुन जातात. चा मा होतो.त्यातून,काका मला वाचवा,असे ऑल टाईम सुपर ड्यूपर हिट संवाद जन्मास येतात.कधी कधी हेच शब्द एखाद्या व्यक्तीवर हुकूमत गाजवायला लागतात.तेव्हा मग तो जर्मनित हिटलर होतो आणि चीनमध्ये माओ होतो.रशियात स्टॉलीन होतो.लिबियात कर्नल गड्डाफी होतो.
   एखाद्याचा प्रत्येक शब्द फुलासारखा झेलला जातो.तर एखाद्याचानिबंध कचराकुंडीचेच भागदेय घेऊन येते.बाबा,बापू,बुवा,महाराज,महंत यांच्या मुखीचे शब्द भक्तीचे रंग ल्यालेले असतात.सनी लेऑन,दीपिका पडुकोन,इशा गुप्ता यांच्या मुखीचे तेच शब्द प्रीतीच्या रंगा मदहोश झालेले असतात.शब्दांनी भूगोल घडविला की माहीत नाही पण इतिहास मात्र घडवला आहे.काही शब्द दारु सारखे असतात तर काही शब्द हे दारुकामासारखे असतात.
   शब्द,हा आपला,तो तुपला,असा भेद अगदी सहज करतात.आपला तो बाळ दुसऱ्याचे ते काट्टं.आता हेच बघा की,एका जणाला जेव्हा क्रिकेटच्या टिममधून काढलं जातं,तेव्हा हा शब्द विश्रांती या गुलाबी नावानं अवतार घेतो.जेव्हा दुसऱ्याला क्रिकेट टिम मधून काढलं की हाच शब्द डच्चू या अवतारात येतो.तर कधी हकालपट्टी हा शेड धारण करतो.विश्रांती,लाडक्यासाठी असते.हकालपट्टी,दोडक्यासाठी असते.विश्रांतीत आदरभाव व्यक्त करण्याचा सभ्यपणा असतो.हकालपट्टीत हुच्चेपणा दर्शवणारी तुच्छता असते.लाडका थकतो त्यामुळे त्यास विश्रांती.दोडक्याचा फार्म गेला असतो म्हणून त्याची हकालपट्टी.लाडक्याचा फार्म कधीच जात नसतो.त्याच्या धावा निघत नाहीत तेव्हा त्याचं टायमिंग जरासं बिघडलं असतं.ते दुरुस्त व्हावं म्हणून त्यास विश्रांती.मात्र दोडक्याच्या बॅटितून धावा निघत नाही तेव्हा त्याचं टायमिंग जरासं नव्हे तर निवृत्ती घेण्याचा (त्याने)विचार करण्याइतपत बिघडलेलं असतं.म्हणून मग हकालपट्टी.
   असा भेदभाव शब्द अगदी यूँव करून जातो. एकाच घटनेला असे दोन अँगलने बघण्याचा शिष्टपणा शब्द शतकानुशतके करत आला आहे.मुसोलीनी करतो ते अनन्वित अत्याचार.चर्चिल करतो ते राष्ट्रभक्ती. अमिरांचा साहेबाजादा जेव्हा,पहले शराब जिस्त थी,अब जीस्त (जीवन) है शराब/ कोई पिला रहा है,पिये जा रहा हूँ मै,असं गुणगुणतो तेव्हा त्याकडे कौतुकानं बघून त्याच्या रसकतेची वाहवा केली जाते.तुमच्या आमच्या सारख्यांचं पोरगं असं काही गुणगुणायला लागलं तर ते कामातून गेलं,वाया गेलं असं बोलून त्याचा बँडबाजा वाजवला जातो.लाडक्याला शब्दसुमने आणि दोडक्याला शब्दाचा मार..जगाची रित अशीच ..कबीर म्हणाले तेच खरं ...

शुक्लकाष्ठात शेक्सपिअर


शुक्लकाष्ठात शेक्सपिअर
    शेक्सपिअर हे  शब्दप्रभू.असं मऱ्हाठी साहित्यिकांना फार पूर्वीपासून वाटत आलं आहे.इतकं की आपले कालिदास रामटेककर हे आर्यावर्ताचे शेक्सपियरच जणू,असं एक समिकरण इकडच्यांनी करुन टाकलं.
    शेक्सपिअर यांचं साहित्य म्हणजे सृजनाचा देखणा सोहळा.अल्टिमेट!अमिताभ बच्चन म्हणतात मी जिथे उभा राहतो तिथून रांग सुरु होते.तसच शेक्सपिअर  क्रंमांक एकवर आणि त्यांनतर इतर सारे असं देशी भाषिक संशोधकांना वाटतं.
    शेक्सपिअर यांचा साहित्यिक पराक्रम हा नेपोलियन आणि अलेक्झांडर यांच्या एकत्रित पराक्रमाच्या प्रभेला काळवंडून टाकणारा होता असंही काहींना वाटतं.तरी बरे या पराक्रमीविरांमध्ये कुणी औरंगजेब महादयांचे नाव सामील केलेलं नाही.
    शेक्सपिअर यांनी अब्जावधी शब्दांचे सृजन केले म्हणूनच ते शब्दप्रभू.पण या शब्दप्रभूला शब्दांनी धन काही मिळवून दिलं नसावं किंवा धन मिळालं तरी,कर लो दुनिया मुठिठमे हे स्वप्न साध्य करण्यासाठी ते धन पुरेसं नसावं.त्यामुळे शब्दांच्या साम्राज्यात अबलख घोडयावरुन रपेटिला निघालेले शेक्सपिअर म्हणे धान्याच्या  काळ्याबाजाराची कला शिकले.त्या कलेत ते लेखन कलेइतकेच तरबेजही झाले.या काळ्याबाजारातून त्यांना बरेच धन मिळाले.त्यातून त्यांनी सावकारी सुरु केली.पैसाही पैसे के पास दौडके आता है,असं थोरले अंबाणी कधी तरी म्हणालेच होते.तद्वतच शेक्सपिअरांच्या देशातला पौंड त्यांच्या पौंडाकडे धावायला लागले.इन्कमटॅक्स वाल्यांना कुणाचं चांगलं बघवत नाही.मग ते ड्रॅगनच्या , अंकल सॅमच्या की महाराणींच्या देशातले असो.त्यांनी शेक्सपिअरांच्या अतिरिक्त पौंडाचा पाठलाग केला.त्यांच्या घरावर धाडी टाकल्या.पुढचे सारे सोपस्कार झाले.इन्कम टॅक्स चुकवताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो लेखक महाशय.सूर्यही मावळणाऱ्या ब्रिटिश साम्राज्यातील लोकांना तुम्ही आपल्या पुस्तकातील शब्दांद्वारे मूल्यशिक्षण देण्याचा आव आणता,आणि स्व:ता मात्र साव बनता..शेक्सपिअर महाराज हे बरे नव्हे हो..हा संवाद (नक्किच) घडला .(असावा.)
    पुढे हे प्रकरण संवादापुरतच मर्यादित राहिलं नाही. त्या कार्यतत्पर इन्कमटॅक्स ऑफिसरने ,आपल्या फर्राटेदार लेखणीने लिहून ठेवले,शेक्सपिअर हे करचुकवे आणि करबुडवे आहेत.(कदाचित तो शेक्सपिअरांना म्हणालाही असेल की बघा, केवळ आपणावरच सरस्वती प्रसन्न नसून माझ्यावरसुध्दा आहे.तुमचं लिखान सूर्यचंद्र असेपर्यंत असेलच पण माझी ही नोट सुध्दा अजरामर होईल.)
    ही ऐतिहासिक नोंद झालेला कागद परवाच इंग्लडात सापडला.शेक्सपिअर करबुडवे होते.धान्याचा काळाबाजार करीत होते.हे त्यातून मिडियासमोर आले.तुम्ही सुध्दा..तुम्ही सुध्दा असा घोष सुरु झाला.शेक्सपिअरांनी त्यांच्या एका पात्राच्या मुखी असं वाक्य घातलं होतं.त्याची यानिमित्त उजळणी झाली.शेक्सपिअरांचे तसे वागणे चूक होते की नव्हते ,असा प्रतिवाद सुरु झाला.ते प्रतिभावंत ना!आपल्या संजू बाबासारखेच.एके 47 बंदूक घरी ठेवण्याचा गुन्हा सिध्द होऊन तो निष्पापच,असं उच्चरवानं सांगण्याचं पवित्र कार्य आपल्याकडे चाललय, तसचं हे.शेक्सपिअर हे शेक्सपिअर असल्याने त्यांना माफ  करा,त्यांच्यासारख्या सर्जनशील लेखकानं असं केलच असेल तर त्याच्या कारणांचा मागोवा घ्या..शेक्सपिअर असं करुच शकत नाही,त्यांच्यावर जळणाऱ्या लेखकांचं हे कारस्थान कां राहू शकतं,फ्रांसने नेहमीच ग्रेट बिटनचा दु:स्वास केलाय त्यांनी त्यातून तर हे प्रकरण घडवलं गेलय नाहीय ना.. याचा आधी शोध घेतलेला बरा.हा शोध घेतला जाईल का?कधी घेतला जाईल? यथावकाश कळेलच.पण शेक्सपिअर यांनी असं जर काही खरोखरच केलं असेल तो फारच उद्दमी आणि उद्योगी होता हे सिध्द होतं.अशी उद्योगी माणसंच कर्तृत्वान ठरुन त्यांच्या घरातल्या हंडयात ऋध्दीसिध्दी पाणी भरतात,मग ते सहारा श्री असोत की मिस्टर शेक्सपिअर..आणि अशांच्याच पाठिमागे कोणते ना कोणते शुक्लकाष्ठ कधी ना लागतेच लागते, मग ते श्रीयुत दाऊद असोत की मिस्टर शेक्सपिअर..
    000