Sunday, September 29, 2013

नियमानुसार काम की कामानुसार नियम?

नियमानुसार काम की कामानुसार नियम?
      रावसाहेब म्हणजे नियमांचा पक्का माणूस. सगळे नियम तोंडपाठ . त्यांनी नियम सांगणे सुरु केल्यावर भाऊसाहेबांची बोलती बंद झालीच पाहिले. बॉस-साहेबांचा तर प्रश्नच नसे.मला सांगू नका. काम कसे होईल ते बघा.एव्हढं साधं-स्वच्छ-सरळ असं त्यांचं सांगणं असे. पण नियमाशिवाय काम म्हणजे निविदेशिवाय रस्त्याची कामे किंवा तेलाशिवाय
भजी. अशी कामं केली तर कधीना कधी रोडरोलर अंगावरुन फिरणारच. भाऊसाहेबांना याची जाणीव असल्याने रावसाहेबांच्या काटेकोर  नियम(प्रेम)रुपी गुलाबाचे काटे रुतत असले तरी त्या काट्यांकडे ते दुर्लक्षच करायचे.त्यामुळे भाऊसाहेबांनी अमूक तमूक नियम दाखवा असं कधी रावसाहेबांना म्हंटलं नाही.
      असं सांगितलं जातं की,हजारो वर्षांपूर्वी वेद-उपनिषेदातील ऋचा तोंडपाठ करण्याचा परिपाठ होता. त्यामुळे ज्यांचं पाठातंर उत्तम त्यांच्या ऋचा अधिकृत.कुठे लिहिलीय ही ऋचा,असं कोणी कुणाला दरडावल्याचं एकाही  पाषाणावर पोरस-हुण-कुशानांनी कोरलं नाही की अशोकानेही कोरलं नाही.दस्तुरखुद्द औरंगजेबाला सुध्दा हे सुचलं नाही.
       रावसाहेबांचंही तसंच झालं होतं.एखाद्यानं नियम दाखवण्याचा आग्रह केला तर त्यांच्या अस्मितेल्या आधी बार्किंग आणि नंतर  बायटिंग डॉग्जचं रुप आलंच म्हणून समजायचं. गेलं ढोढ्यात, असं जोरात खेकसून,फाइल भिरकावून रावसाहेब तरातरा निघूनच जाणार.हे सगळ्यांना ठाऊक असल्यानं,रावसाहेबांनी कोणत्या पुस्तकातील नियमांचा आधार घेतला हे विचारण्याची हिम्मत करणं म्हणजे उंदरानं स्वत:हून मांजरापुढे जाऊन, गधे मुझे लाथ हाण, असं करण्यासारखं होतं.
      सगळयांना कळून चुकलं होतं की,फाइलवर नियमाची नोंद हवी.तो नियम कुठून आला,कसा आला ,कधी आला हे महत्वाचं नाही.किंवा अप्रस्तुतच आहे.(माहितीच्या अधिकारात पुढे-मागे कुणी विचारलच तर पुस्तक मिळत नाही किंवा शॉर्ट सर्किटमध्ये पुस्तक जळून गेलं,असं सांगण्याची सोय आहेच.) काम होण्यासाठी नियम हवा.काम झाले की फाइल बंद.त्या कामाला नियमाचं कवच लाभलं असल्यानं चिंतेचं कारण सांप्रतकालीन कुणी करण्याचं कारण नाही.भविष्यात कधीतरी ऑडिटरांना बंद फाइलमधील नियमांबद्दल शंका आलीच तर  ती शंका कू नसून सु असल्याचं मान्य केलं की काम फत्ते.शिवाय हा असा फाइलमध्ये नमूद नियम नाहीच्च,असं दाखवण्याची जबाबदारी ऑडिटरला घ्यावी लागेल. अशी जबाबदारी घ्यायची म्हणजे पुस्तक पाठ हवे किंवा सोबत हवे,किंवा ज्या ऑफिसात तो गेला असेल तिथे ते त्याक्षणी हवे.तिथे ते असल्यास त्या त्यापुस्तकात त्याविशिष्ट नियमांचे पृष्ठ असायला हवे.ते पृष्ठ जीर्णशिर्ण झाले असेल,फाटले असेल किंवा गहाळ झाले असेल तर,काय करणार?
      ऑफिसातले पुस्तक म्हणजे सार्वजनिक मालमत्ता.(एस टीच्या स्थानकातील स्वच्छतागृहासारखी.)नियमांचे पुस्तक ऐनवेळी दुकानात मिळायला ते काही पारले बिस्किट नव्हे.शिवाय दुकानात जुनी आवृती मिळाली तर कसे? नियम  नव्या आवृत्तीत असू शकतो ना! नवी आवृत्ती निघूच्च शकत नाही ,असा हेका ऑडिटर धरु शकत नाही.याचा अर्थ  ऑडिटरचाही रावसाहेब झाला नसल्यास,इकडे आड नि तिकडे विहीर.विहीर पाण्याने भरली असेल तर प्राण कंठाशी ,कोरडी ठणठणित असेल तर कपाळपमोक्ष आणि हातपायांच मोडणं ठरलेलच.तेव्हा रावसाहेबांनी फाइलमध्ये नमूद केलेल्या नियमांना आक्षेप घेण्याची हिम्मत ऑडिटरांना दाखवण्यासाठी  सिहांचं  काळीज लागलं असतं.ते कसं असतं ,हे कुणालाही ठाऊक नसल्याचं रावसाहेब आणि ऑडिटरही  चांगलेच ओळखून होते.(सिंहाला काळीजच नसतं अशी भाऊसाहेबांची खात्री होती.या खात्रीवर बॉस-साहेबांचा ठाम नसला तरी काळ-वेळ-सोईनुसार विश्वास होता.)
      समजा एखद्या ऑडिटरने नियम प्रकरण रेटून नेण्याचा बाणा दाखवलाच तर भाऊसाहेब ,त्या बाण्याचं समाधान,सुखानं करण्याची कला प्राप्त करुन होते.या कलेत रमणारा रसिक अद्याप तरी  भाऊसाहेबांना भेटलेला नाही.

000

स्साला एक झुरळ...

स्साला एक झुरळ...
      चीनमधून पळून गेलेल्या एक कोटी झुरळांची थिअरी क्रमांक एक आपण गेल्याच आठवड्यात बघितली. हा विषय घनगंभीर असल्यानं याची थिअरी क्रमांक दोन सुध्दा राहू शकते. प्रश्न संख्येचा आहे. एक कोटी ही  संख्या अबब करायला लावणारी अशीच.एक कोटीचे नाणे आपल्या समोर टाकले तर आपले फुफ्फुसच ऑफ व्हायचे. कौन बनेगा करोडपती जेव्हा सुरु झालं तेव्हा ते एक कोटीचं होतं.तो आकडा कानावर पडताच भारताच्या ऐंशी कोटी नागरिकांच्या पोटात धस्स झालं होतं.तेव्हा या कोटीच्या आकड्याची महती अशी असल्याने एक कोटी झुरळ पळून जातात तेव्हा त्याची थिअरी एकच कशी काय राहू शकेल?
000
      थिअरी क्रंमाक दोन अशी राहू शकते की,हे एक कोटी
झुरळ प्रत्यक्षात अस्तित्वातच नव्हते. म्हणजे त्यांचं अस्तित्व हे कागदोपत्रीच असावं. कागदावर जशा विहिरी राहू शकतात, किंवा रोजगार हमी योजनेच्या कामावर बिल क्लिंटनही हजेरी लावू शकतात. तशी शक्यता नाकारता येत नाही. हिंदी-चिनी कधी काळी भाईभाई असल्याने एकमेकांना एकमेकांचा वाण नाही तर गुण तर लागू शकतो.तेव्हा कागदावरच असलेल्या या एक कोटी झुरळांना प्रत्यक्ष बघण्याचे फर्मान तिकडच्या भाऊसाहेबांनी तिकडच्या रावसाहेबांना दिल्यानंतर त्यांना हार्टअटॅक वगैरे काही आला नसावा. त्यांनी शांतपणे एस्स सर म्हणून झुरळ दाखवण्याची जय्यत तयारी सुरुही केली असावी. त्या तयारीचा भाग म्हणून ते प्राथमिक बाबींची पूर्तता करण्यासाठी जेव्हा एक कोटी झुरळ ठेवलेल्या ठिकाणी गेले,तेव्हा तेथील दृष्य बघून त्यांना हायसेच वाटले असावे. कारण एक कोटी झुरळ जे कागदावरच होते ते आता प्रत्यक्षात नव्हते.(होत्याचे नव्हते यालाच म्हणतात.)
      रावसाहेबांपुढचा प्रश्नच मिटला ना! कारण झुरळं पळून गेले,हे सध्याचं वास्तव होतं.झुरळांनी पळून जाऊ नये म्हणून त्यांच्या पायात बेड्या अडकवलेल्या नव्हत्या. जे मुक्त असतात ते पळू शकतातच. या कथनावर भाऊसाहेब निरुत्तरच होणार होते. याची खात्री रावसाहेबांना असणार,त्यामुळे कागदावरचे झुरळ पळाले या घटनेने त्यांना हायसे वाटले.      हे गणित तसे समजायला सोपे नाही.त्यातली आकडे मोड अदृष्य अशी आहे. तरी प्रश्न असा उरतोच की कागदावर तरी एक कोटी झुरळ कां अस्तित्वात होते?
      जेव्हा अस्तिवात नसलेल्यांचे अस्तित्व गृहित धरले जाते,तेव्हा खरे तर क्रांतीची ठिगणीबिणगी पडते असे म्हणतात. जर हे सत्य असेल तर झुरळांच्या मनात क्रांतीची ठिणगी पडावी असा दुष्ट विचार कुणाच्या मनात तर आला नाही ना?झुरळं क्रांती करुन काय करणार? त्याला काही त्याचे स्वतंत्र राज्य थोडेच हवे. तो राज्य करण्यासाठी पात्रता अंगी बाणून आहे का? यावर कार्ल मार्क्सने विचारमंथन केल्याचे दिसत नाही.तोच नाही तर इतरांचा प्रश्नच उरत नाही.
      झुरळांनी क्रांतीप्रणव व्हावे असे दिवास्वप्न एखाद्या कविने बघण्याची शक्यता कमीच आहे. हा कवी रोमँटिक असेल तर नवीच भानगड व्हायची. कारण त्याला झुरळात जर त्याची प्रेयसी दिसली आणि त्याला कळले की एक कोटी जे झुरळ पळाले त्यात ही प्रेयसीही होती.म्हणजे कवीचा कडेलोट व्हायचा. पळून जाणारी प्रेयसी ज्या कविला असणार त्याचा पुरुषार्थ किती टिनपाट असणार? याचा अर्थ कुणाला तरी झुरळ-प्रेयसी आणि टिनपाट-पुरुषार्थ हा सिध्दांत तर रेटून न्यावयाचा नाही ना,या प्रतिमेतून.म्हणजेच कविचे नीतीधैर्य एकदा खचले की त्याची प्रतिभा बसली. बसलेल्या प्रतिभेचा कवी कसल्या डोंबल्याच्या प्रतिमा निर्माण करणार. उदात्त..मंगल किंवा क्रांतीप्रसव अशा.
      एक कोटी झुरळांच्या पळून जाण्याच्या घटनेच्या आगेमागे अशा अनेक दृष्य आणि अद्ष्य घटनांची मालिका गुंफलेली आहे. यातलं रहस्य हेच की झुरळं खरोखरच एक कोटी होते का? दोन कोटी कां नव्हते? किंवा मग एक लाख कां नव्हते? एक कोटीचा आकडा आला कसा? आणि रावसाहेबांनी हा एकच कोटी आकडा भाऊसाहेबांना कां सांगितला? रावसाहेबांची तर कुठे गफलत झाली नाही ना ? याचा अर्थ असणारे किंवा नसणारे झुरळ पळून गेले असतील तर रावसाहेब चांगलेच अडचणित येणार हे सत्य.ते अडचणित म्हणजे भाऊसाहेबही गोत्यातच की.स्साला एक झुरळ आदमी को पागल बना देता है ..नही क्या..